आम आदमी पक्षाचा निंबाळकरांना जाहीर पाठिंबा
खानापूर : देशात इंडिया आघाडी निर्माण झाली असून आम आदमी इंडिया आघाडीचा एक भाग असल्याने आम्हाला काँग्रेसला पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा असून यापुढील काळात कारवार मतदारसंघात प्रचारात सक्रिय होणार असून तालुक्यासह मतदारसंघातील सर्व मतदारांनी काँग्रेसला भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भैरु पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. येथील शिवस्मारक भवनात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. देशात हुकुमशाही निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे. देशातील सर्व स्वायक्त संस्थांना हाताशी धरुन विरोधकांना वेठीला धरले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीचा कायापालट करणाऱ्या आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नाहक तुरुंगात डांबले आहे. जर देशात पुन्हा भाजप सत्तेत आल्यास निश्चितच हुकुमशाही येणार यात शंका नाही. यासाठी इंडिया आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
काँग्रेसचा जाहीर प्रचार करणार
आपच्या वरिष्ठांच्या सुचनेनुसार आम्ही कारवार मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देत असून यापुढील काळात काँग्रेसचा जाहीर प्रचार करणार आहोत. खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळाल्याने या संधीचा पुरेपूर फायदा खानापूर तालुक्यातील मतदारानी करून घेणे काळाची गरज आहे. यापूर्वी कधीही कारवार लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. ती काँग्रेसने यावेळी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरुन अंजली निंबाळकर यांना मतदान करावे, असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी आपचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी गुंजीकर, शहराध्यक्ष गोपाळ गुरव, लबीब शेख, रमेश कौंदलकर, के. बेकीनकेरी यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.