पूरग्रस्तांना ‘अक्षरदासोह’चा आधार
पूरग्रस्त मूलभूत सुविधांपासून वंचित : शाळेतील मुलांच्या आहाराचा प्रश्न निर्माण : कागवाड तालुक्यातील परिस्थिती
बेळगाव : पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलेल्या काळजी केंद्रांमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी आता अक्षरदासोह योजना आधार ठरू लागली आहे. अन्न, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? अशी हाक पूरग्रस्तांनी दिली आहे. जुलै मध्यानंतर जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाले आणि जलाशयांच्या प्रवाहात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: कागवाड, चिकोडी, निपाणी, अथणी, रायबाग तालुक्यातील नदीकाठांवर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पूर आलेल्या भागातील 3489 नागरिकांचे काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र याठिकाणी त्यांना अन्न, पाणी, अंथरूण, पांघरूणची कमतरता जाणवत असल्याचे दिसत आहे. शासनाने पुरातून स्थलांतरीत केले, मात्र अन्न-पाण्यापासून वंचित ठेवले, अशी खंतही पूरग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
शासनाकडून रेशनपुरवठा नाही; शाळेतील आहारावर अवलंबून
जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी पूरग्रस्तांना हलविण्यात आले आहे. मात्र याठिकाणी पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान अन्न, पाणी, अंथरूण आणि इतर गोष्टी पुरविण्यात तफावत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे काळजी केंद्रातही हाल होत आहेत. शासनाने रेशनपुरवठा केला नसल्याने पूरग्रस्तांना शाळेतील अक्षरदासोह योजनेवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र शाळेतील मुलांच्या आहाराचा प्रश्न निर्माण होत आहे. कागवाड तालुक्यातील काळजी केंद्रामध्ये आश्रय घेतलेल्या पूरग्रस्तांची परिस्थिती गंभीर बनली आहे.