कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानी योग्याने ज्ञानेन्द्रियांवर नियंत्रण मिळवलेले असते

06:28 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, इंद्रियांच्या स्वैर वर्तनामुळे मनाची होणारी चलबिचल हेच खरे दु:खाचे कारण आहे. म्हणून साधकाने इंद्रियांनी दाखवलेल्या किंवा सुचवलेल्या विषयांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे. जे इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी पडून विषयांकडे धावतात त्यांचे मन भरकटते. इंद्रियांच्या आग्रहाला सामान्य माणसे नेहमीच बळी पडत असल्याने केलेली पाप-पुण्ये भोगण्यासाठी संसार सागरात वारंवार बुडत असतात. विशेष म्हणजे अज्ञानी माणसेच असे वागतात असे नाही तर आत्मज्ञान होऊन यथावकाश ब्रह्मनिर्वाण प्राप्त होणार असलेला योगीही इंद्रियांनी दाखवलेल्या विषयोपभोगांच्या आकर्षणाला बळी पडतो आणि स्वत:चे नुकसान करून घेतो. हे नुकसान एव्हढे मोठे असते की, त्याची सर्व साधना वाया जाऊन त्याला पुनश्च हरि ओम करण्याची वेळ येते. आपल्याकडे मनुष्य दुर्लक्ष करतो आहे हे पाहून इंद्रिये त्यांचा प्रभाव दाखवायला मिळणाऱ्या संधीची वाट पहात दबा धरून बसलेली असतात. कधी संधी मिळते आणि कधी आम्ही माणसाच्या मनावर झडप घालून त्याचा ताबा घेतो असे त्यांना झालेले असते. त्यामुळे संधी मिळताच ती उट्टे काढल्याशिवाय रहात नाहीत.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे महाबाहो, ज्याने विलक्षण धैर्याने इंद्रियांच्याकडे दुर्लक्ष केलेले असते त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. त्यांनी कोणती प्रलोभने दाखवायची, कोणती नाहीत हे तो ठरवतो आणि त्याबरहुकूम ती काम करतात. त्यामुळे त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते. म्हणून हे धनंजया ! आपली ही इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली, तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे? कारण जीवनात याहून मोठे मिळवावयाचे असे काहीच नाही.

म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा । ओढूनि घेतली आंत त्याची प्रज्ञा स्थिरावली ।।68 ।।

माउली कासवाचे उदाहरण त्यांच्या विवरणात देताना म्हणतात, ज्याप्रमाणे कासव संकटकाळी आपले अवयव आवरून घेते. देवाने स्वसंरक्षणासाठी त्याला ही युक्ती प्रदान केली आहे. कासवाप्रमाणे ज्या माणसाला ज्ञानेन्द्रियांना ताब्यात ठेवण्याची युक्ती साधलेली असते त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज.

त्याची ज्ञानेंद्रिये तो इच्छा करेल तेव्हढेच आणि त्याला हवे असतील त्यावेळेलाच विषय त्याला दाखवत असतात. तसेच तो सिद्धींच्या प्रलोभनांनाही बळी पडत नाही मात्र लोककल्याणासाठी त्यांचा वापर आवश्य करतो.

गीताई चिंतनिकेत ह्याबद्दल विनोबा म्हणतात, इंद्रियांची संपूर्ण स्वाधीनता साधणे सामान्य मनुष्याला लगेच शक्य होण्यासारखे नाही कारण त्यासाठी स्थितप्रज्ञ व्हायला हवे परंतु सामान्य माणसाने धोक्याची जाणीव दिसल्यावर तरी सावध होऊन कासवाप्रमाणे आपल्या इच्छा, वासना आवरून धरल्या पाहिजेत. विनोबांचे हे बोल आपल्या सर्वांसाठी फार उपयोगाचे आहेत. ह्या बाबतीत श्री गोंदवलेकर महाराज फार मजेशीर उदाहरण देतात. ते म्हणतात, समजा एखाद्या स्टेशनवर पेरू चांगले मिळतात हे माहित असलेला मनुष्य पेरू घेण्यासाठी गाडीतून खाली उतरला तरी तो त्या पेरूच्या मोहात कुठपर्यंत अडकून पडेल तर जोपर्यंत गाडीची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत. एकदा शिट्टी वाजली की, गाडी निघून जाईल हे लक्षात घेऊन तो लगेच गाडीत जाऊन बसेल. तसे माणसाने नुकसानीची चाहूल लागली की लगेच सावध व्हावे आणि इंद्रिये दाखवत असलेल्या आकर्षणाकडे पाठ फिरवून स्वत:ला सुरक्षित करावे.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article