फुलांच्या उधळणीने अनोखी रंगपंचमी
पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंगांना फाटा
प्रतिनिधी/ बेळगाव
रासायनिक रंगांच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे शारीरिक हानी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा अभिनव उपक्रम नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने मागील काही वर्षांपासून सुरू आहे. शनिवारी वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव, खासबाग यासह ग्रामीण भागात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये प्रतिष्ठानच्यावतीने फुलांची उधळण करत अनोखी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
खासबाग सर्कल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करण्यात आली. पोलीस प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत पाणी आणि रासायनिक रंग यापासून दूर राहून इतरांनीही अशाच प्रकारे रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रशेखर ए. जी. यांच्यासमवेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर, अमृत भाकोजी, यल्लाप्पा कोलकार, हिरालाल चव्हाण, मनोहर होसूरकर, प्रभाकर भाकोजी, नगरसेवक रवी साळुंखे, नेताजी जाधव, बापू जाधव यासह इतर उपस्थित होते.