स्मरणशक्तीला प्रणाम
माणसाची स्मरणशक्ती हे कोणालाही न सुटलेले कोडे आहे. काही बालके जन्माला येतानाच अशी स्मरणशक्ती घेऊन आलेली असतात की आपल्याला आश्चर्य वाटते. सर्वसामान्य माणसाला कित्येकदा त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांकही लक्षात रहात नाही. राजस्थान राज्याच्या भीलवाडा जिल्ह्यात एक आठ वर्षांची बालिका अशी आहे, की जिने केवळ अडीच मिनिटांमध्ये संपूर्ण हनुमान चालिसा म्हणण्याचा विक्रम नोंदविला आहे. या बालिकेचे नाव ‘सिया’ असे आहे. या विक्रमामुळे तिचे नाव भारत विक्रम पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आणि अंकिता अग्रवाल हे तिचे मातापिता अत्यंत आनंदात आहेत. सिया हिची स्मरणशक्ती बालपणापासूनच असामान्य आहे.
पाठांतर करण्याची तिची क्षमता लोकोत्तर असल्याची ख्याती आहे. अनेक आरत्या, भजने, मंत्र, स्तोत्रे, धार्मिक कथा तिला तोंडपाठ आहेत. बालपणापासून तिचे भरण पोषण धार्मिक आणि सात्विक वातावरणात झाले असल्याने धार्मिक साहित्याकडे तिचा विशेष ओढा आहे. त्यामुळे तिच्या वयाच्या इतर बुद्धीमान मुलामुलींमध्येही तिची क्षमता विशेष उठून दिसते. ही बालिका पुढे देशाचे नाव उज्ज्वल करेल, असे भाकित अनेक मान्यवरांनी केले आहे. एखादा आशय एकदा वाचला की तिला तो त्वरित तोंडपाठ होतो. तिच्या या एकपाठीपणाचे साऱ्यांना आश्चर्य वाटते. राजस्थानच्या राज्य सरकारनेही तिच्या या असामान्य क्षमतेची नोंद घेऊन तिच्याशी संपर्क केला आहे. सिया ही अत्यंत निगर्वी आणि सालस बालिका म्हणून प्रसिद्ध आहे.