सव्वादोनशे वर्षांचे झाड
भारत हा अतिपुरातन आणि अनेक वैविध्यांनी भरलेला देश आहे. या देशाचा प्रत्येक भाग आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यांमुळे परिचित आहे. त्यामुळे देशी आणि विदेशी संशोधकांचा भारतासंबंधीचा अभ्यास आणि निरीक्षण सातत्याने होत असते. या संशोधन कार्यातून प्रत्येक वेळी नवनवी आश्चर्ये आणि नाविन्ये हाती लागत असतात. पश्चिम बंगालमधील हावडा येथील शिबपूर येथे असलेल्या एका विशाल वटवृक्षाची माहिती अशाच संशोधनातून मिळाली आहे. हा वटवृक्ष 225 वर्षांहूनही अधिक मोठा असून त्याचा विस्तार पाच एकर भूमीत झाला आहे. वटवृक्ष मोठा झाल्यानंतर त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटतात आणि त्या पारंब्यांची टोके भूमीपर्यंत पोहचली की तिथे ती रुजतात आणि नव्या वटवृक्षाचा जन्म होतो. अशा प्रकारे वटवृक्षाचा वंशविस्तार मोठ्या भूभागात होतो. दुर्दैवाने कित्येक वटवृक्ष असे विस्तारण्याअगोदरच तोडले जातात. पण या अनिर्बंध वृक्षतोडीतून हा वृक्ष गेली सव्वादोनशे वर्षे वाचल्याने त्याचा असा परिपूर्ण विस्तार होऊ शकला आहे.
या वृक्षाची नोंद आता गिनीज विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. गेल्या सव्वादोनशे वर्षांमध्ये या वटवृक्षाच्या चारशे शाखा निर्माण झाल्या आहेत. मूळ वटवृक्ष आता वठला असल्याचे दिसून येते. तरी तो आपल्या शाखांच्या माध्यमातून जिवंत आहे. आता या वृक्षाला पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले आहेत. भारतातील हा सर्वात जुना वटवृक्ष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.