For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रताळी वेल वाचविण्यासाठी धडपड

10:24 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
रताळी वेल वाचविण्यासाठी धडपड
Advertisement

पाणी देण्याची वेळ : पावसाची नितांत गरज : बहुतांश भागात पेरणी कामे खोळंबली

Advertisement

बेळगाव : मागील आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने लागवड केलेली रताळी वेल सुकण्याच्या मार्गावर असल्याने ती वेल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. मागील आठवड्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रताळी लागवडीचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने रताळी वेल सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेल वाचविण्यासाठी पाणी देण्याची वेळ आली आहे. अलीकडे रताळी वेल लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. भुईमूग, सोयाबीन आणि बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्या ठिकाणी रताळी वेल लागवडीचे प्रमाण वाढले आहे. लागवड करताना पावसाची गरज असते. यासाठी मागील आठवड्यात झालेल्या पावसावेळी रताळी वेल लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पावसाने आठवडाभर उघडीप दिल्याने वेल सुकू लागली आहे. अशा परिस्थितीत रताळी वेल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

लागवडीसाठी दमदार पावसाची गरज

Advertisement

खरीप हंगामात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, रताळी, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटा लागवडीबरोबर रताळी वेल लागवडीचे कामही सुरू आहे. भात, सोयाबीन आणि भुईमूग,बटाटा लागवडीला उघडिपीची गरज आहे. मात्र, रताळी वेल लागवडीसाठी दमदार पावसाची गरज असते. मात्र, आठवडाभरात पाऊसच झाला नसल्याने रताळी वेल लागवड करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील बेळवट्टी, बिजगर्णी, बडस, बेळगुंदी, राकसकोप, कुद्रेमनी, सोनोली, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ आदी भागात रताळी वेल अधिक प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, सध्या पाऊस गेल्याने हे काम थांबले आहे.

मान्सून वेळे दाखल पण,...

हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय मान्सून वेळेत दाखल देखील झाला होता. मात्र, त्यानंतर मान्सून अधिक सक्रिय झाला नाही. त्यामुळे पेरणीकामाचा खोळंबा झाला आहे. काही भागात पावसाअभावी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. त्यामुळे पेरणी आणि लागवडीची कामे थांबली आहेत. विशेषत: पेरणी केलेल्या भात, सोयाबीन, भुईमूग आणि रताळी वेल लागवडीला पावसाची नितांत गरज आहे.

Advertisement
Tags :

.