डॉक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाची त्वरित चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोलकाता येथे आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर निर्घृण बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी व आरोपीवर कठोर कारवाई केली जावी, या व अन्य मागण्यांसह काहेर विद्यापीठाच्या जे. एन. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर व विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कार वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने देशभरातील डॉक्टर व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी देशभरातील डॉक्टर आणि आयएमए संघटना निदर्शने करत आहेत. बुधवारी जेएनएमसी डॉक्टरा, पीजी डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांनी शेकडोच्या संख्येने जेएनएमसीपासून भव्य मोर्चा काढला व जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली.
सरकारने काळजी घेण्याची मागणी
याप्रसंगी डॉक्टरांनी सदर घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. ‘वुई वाँट जस्टीस’, ‘डॉक्टरांवर हल्ला म्हणजे मानवतेवर हल्ला’, ‘महिलांवरील अत्याचार रोखा’, ‘सुरक्षितता नसेल तर कामही करणार नाही’ अशा आशयाचे फलक त्यांनी हातात धरले होते. या ठिकाणी मोर्चाचे नेतृत्व करताना डॉ. एम. बी. बेल्लद यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून, डॉक्टरांना गृहित धरणे बंद करा, न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असाच अर्थ होतो. सुरक्षित वातावरण नसेल तर डॉक्टर काम करू शकणार नाहीत आणि डॉक्टरांनी काम थांबवले तर समाजाचे आरोग्य धोक्यात येईल, असे सांगून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी केली.
वैद्यकीय क्षेत्रावर सातत्याने असे अत्याचार होत आहेत. डॉक्टरांना रात्रपाळी करावी लागते. अशा परिस्थितीत जर काम करण्याच्या ठिकाणी सुरक्षितता नसेल तर काम कसे करणार, असा प्रश्न डॉ. वीरेश मानवी यांनी करून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. डॉ. नवज्योती या पीजी विद्यार्थिनीसह अन्य विद्यार्थिनींही तीव्र शब्दात सदर घटनेचा निषेध करून आपला संताप व्यक्त केला.
‘वुई वाँट डीसी’ च्या घोषणा
डॉक्टरांचे निवेदन स्वीकारण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी हे सामोरे आले. मात्र, डॉक्टरांनी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनाच भेटायचे आहे, त्यांनीच आमचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करून ‘वुई वाँट डीसी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, जिल्हा क्रीडांगणावर पाहणीसाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पर मोर्चाच्या ठिकाणी येऊन निवेदनाचा स्वीकार केला.
पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना न्याय द्या
या निवेदनात डॉक्टरांनी नमूद केले आहे, की सदर प्रकरणाची सत्वर चौकशी केली जावी व डॉक्टरांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. सदर घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर आंदोलन करत आहेत, त्यांना पोलिसांनी धाकधपटशा दाखवू नये, निदर्शने करण्याचा त्यांचा हक्क लक्षात घ्यावा. या घटनेतील पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देतानाच नुकसानभरपाई द्यावी. तसेच डॉक्टरांसह सर्व आरोग्य सेवकांना संरक्षण मिळावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदनाचा स्वीकार
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. तसेच सदर घटना अत्यंत निंदनीय आहे. आपण तुमच्या भावना समजू शकतो. जेएनएमसीनेसुद्धा एक समिती स्थापन करावी. उपरोक्त मागण्यांसह अन्य काही मागण्या असल्यास त्या नमूद करून द्याव्यात. जेणेकरून त्यावर कृतीशील पावले उचलणे शक्य होईल, अशी ग्वाही दिली.
या मोर्चात जेएनएमसीच्या प्राचार्य डॉ. निरंजना महंतशेट्टी, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. ज्योती हट्टीहोळी, डॉ. रेखा पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. विरुपाक्षी हट्टीहोळी, डॉ. शिवानंद बुबनाळे, डॉ. माधव प्रभू, विद्यार्थी संघटनेचे डॉ. अमित पाटील, डॉ. राजीव, डॉ. विनय, डॉ. आदित्य पाटील, डॉ. रक्षित मुनवळ्ळी, डॉ. यश पाटील, डॉ. प्रियांका, डॉ. कीर्तना, डॉ. दिनेश, डॉ. सनथ, डॉ. शिवा, डॉ. तनिष्क, डॉ. अजय यांच्या नेतृत्वाखाली जेएनएमसीचे सर्व विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.