For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक पवित्र ‘नाला’

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
एक पवित्र ‘नाला’
Advertisement

नाला म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर विशिष्ट चित्र उभे राहणे स्वाभाविक आहे. नाल्यातून वाहणारे पाणी कित्येकदा अस्वच्छ असते. त्यामुळे नाला हा शब्द कानांवर पडला की आपल्या मनात काही प्रमाणात नकारात्मक दृष्य निर्माण होते. तथापि, उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यात एक नाला असा आहे, की ज्याची ख्याती भारतातच नव्हे, तर भारताच्या बाहेरही पसरली आहे. हा नाला म्हणजे एक आश्चर्य मानले जाते. या नाल्याला कटहल नाला असे संबोधले जाते. तो शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत लाभदायक असल्याने त्याला ‘कष्टहर’ किंवा कष्ट हरण करणारा नाला असेही गौरवेले गेले आहे.

Advertisement

या नाल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेकदा प्रश्नही विचारले जातात, एवढे याचे महत्व मोठे आहे. सुरहा नामक मोठ्या, गोड्या पाण्याच्या सरोवराशी हा नाला जोडला गेला आहे. या नाल्याला एक मोठा इतिहास आहे. महाराजा सूरत यांनी या सरोवराच्या तीरावर आपल्या आयुष्याचा बराच काळ वास्तव्य केले होते. यांना कुष्ठरोग झाला होता. या नाल्याच्या पाण्याने प्रतिदिन स्नान केल्याने त्यांची ही व्याधी बरी झाली होती, अशी कथा येथे प्रचलित आहे.

बलिया येथील सुरहा सरोवर हे आशियातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते. या सरोवरातून निघालेल्या या नाल्याचे वैशिष्ट्या असे, की हा सहा महिने सरोवरापासून वाहतो, तर सहा महिने सरोवराकडे वाहतो. याचाच अर्थ असा की तो सहा महिने सुलटा तर सहा महिने उलटा वाहतो. हा नाला प्रचंड मोठा आणि लांब आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कचरा या नाल्यातून वाहतो असे म्हटले जाते. या जिल्ह्याच्या उत्तर बाजूकडून गंगा नदी तर दक्षिण बाजूकडून शरयू नदी वाहते. हा नाला सुरहा सरोवर आणि गंगा नदी यांना जोडतो. गंगा नदीला जेव्हा पूर येतो, तेव्हा हा नाला गंगा नदीकडून सरोवराकडे वाहू लागतो. तर सरोवरा पाण्याने तुडुंब भरते आणि ओसंडू लागते, तेव्हा तो सरोवराकडून गंगा नदीकडे वाहू लागतो. असा कधी उलट तर कधी सुलट वाहणारा नाला जगात एकमेव असण्याचीही शक्यता आहे. या नाल्याच्या तटावर दोन्ही बाजूंना सुपिक भूमी आहे. शेतकरी या नाल्याच्या पाण्यावरच शेती करतात आणि नफा कमावतात. त्यामुळे हा नाला शेतकऱ्यांसाठी कष्टहर, अर्थात कष्ट हरण करणारा ठरला आहे. तो शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे मानले जाते. तो पाहण्यासाठी भारतभरातून लोक येतात. या नाल्याचे उलट सुलट वाहणे हा एक चमत्कार मानला जातो. त्यामुळे या नाल्याची पूजाही केली जाते. पंचक्रोशीतील लोक याला अत्यंत पवित्र मानतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.