चोख प्रत्युत्तराने देशभर आनंदोत्सव
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याने भारतीयांमध्ये समाधानाची लाट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) केलेल्या अचूक आणि निर्णायक हवाई हल्ल्याने दहशतवाद्यांना एक कडक संदेश दिला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्यानंतर देशवासियांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याने देशभर एकतेची लाट निर्माण झाली. सैन्याच्या या कृतीचे लोकांकडून मनापासून कौतुक केले जात आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या लष्करी कारवाईने दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांना झालेल्या जखमा भरून काढण्याचे काम केले आहे. माजी लष्करी अधिकाऱ्यांसोबतच सामान्य लोकांनाही या कृतीचा अभिमान वाटत आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री अत्याधुनिक शस्त्रास्त्रs आणि अचूक रणनीती वापरून हा हल्ला केला. गुप्तचर माहितीच्या आधारे, पीओकेमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याची पुष्टी झाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, संपूर्ण देश सकाळपासूनच सैन्याचे मनोबल वाढवण्यात गुंतला होता. ऑपरेशन सिंदूरने देशातील लोकांना एकजूट राहण्यासाठी अधिक बळ दिले आहे.
सोशल मीडियावरही आनंदाची लाट
हवाई हल्ल्याची बातमी कळताच देशभरातील लोकांनी सैन्याच्या धाडसाचे आणि कृतीचे कौतुक केले. स्थानिक पातळीवरही लोकांमध्ये याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. भारतीय सैन्याच्या या हालचालीला सोशल मीडियावरही मोठा पाठिंबा मिळाला आणि “इंडिया स्ट्राइक्स बॅक” ट्रेंड होऊ लागला. याशिवाय, लोक आपापल्या पद्धतीने सैन्याच्या या कारवाईचे कौतुक करत होते.