मंगाईनगर येथील ‘त्या’ तलावाला लवकरच कठडा बांधण्याचे आश्वासन
मनपाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली भेट
बेळगाव : मंगाईनगर येथील तलावामध्ये एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. त्या तलावाला कठडा बांधावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी अनेकवेळा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आत्महत्येची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. येत्या चार दिवसात या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन दिले आहे. सदर तलाव हा रस्त्याला लागूनच आहे. त्यामुळे धोकादायक असून त्याला कठडा बांधणे महत्त्वाचे आहे. त्या तलावातील पाणी खराब झाले आहे. त्यामुळे कठडा बांधून तो परिसर स्वच्छ करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर व मंगाईनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तलावाबाबतची संपूर्ण माहिती दिली. तलावाच्या सभोवताली कठडा बांधावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी मनपाचे सचिन कांबळे, ईश्वर कणबूर, अजय चव्हाण, कंत्राटदार आर. नागराज, सहदेव रेमाणाचे, भालचंद्र उचगावकर, श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी, प्रशांत हनगोजी, किरण पाटील, रमेश कडोलकर यांच्यासह इतर रहिवासी उपस्थित होते.