माणसाच्या बुद्धीवर अज्ञानाचा पगडा असतो
अध्याय पहिला
स्वधर्माची जाणीव व आत्मनात्मविवेक समजणे हा योग होय. हा समजला की, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हायला फारसा वेळ लागत नाही. आत्मनात्मविवेक बुद्धी असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंच्या फलांचा त्याग करतो. त्यामुळे निरपेक्षतेने विधिपूर्वक कर्म करण्यात कौशल्य मिळते. म्हणून आत्मनात्मबुद्धी प्राप्त करून घेणे व त्यानुसार कौशल्याने कर्मे करणे हाच खरा कर्मयोग आहे. इंद्रियें जिंकलेला मनुष्य मोहात अडकत नसल्याने जन्मबंधनापासून मुक्त होऊन कल्याणप्रद अशा ठिकाणी म्हणजे मोक्षाला जातो. सध्या आपण अभ्यासत असलेल्या ‘यदा ह्यज्ञानकालुष्यं जन्तोर्बुद्धि क्रमिष्यति । तदासौ याति वैराग्यं वेदवाक्यादिषु क्रमात् ।।51।। ’ ह्या श्लोकात असे सांगितले आहे की, जेंव्हा मनुष्य त्याच्या बुद्धिवर बसलेल्या अज्ञानरुपी धुळीवर मात करेल तेव्हा वेदातील मोहक वचनाबद्दल त्याला वैराग्य प्राप्त होईल.
बाप्पा म्हणाले, निरपेक्षपणे कर्म करुन ईश्वराला अर्पण करावे. कुणाकडे काही मागू नये आदि गोष्टी कळतात पण वळत नाहीत अशी माणसाची अवस्था असते. कितीही नाही म्हंटले तरी माणसाला सकाम कर्म करण्याची सवय यापूर्वीच्या अनेक जन्मात जडलेली असते. त्यामुळे मी सांगितलेलं तत्वज्ञान लगेच पचनी पडणार नाही पण म्हणून निराश न होता मी सांगतो तशी साधना चिकाटीने कर म्हणजे तुला यश मिळेल. त्यासाठी मनावर बळजबरी करू नकोस कारण मनावर जबरदस्ती केलीस तर ते दुपटीने उसळी मारेल. कर्मे करताना ती मला अर्पण करायची सवय लावून घे. कर्मे मला अर्पण करायची म्हणजे कर्माच्या सुरवातीला, करत असताना अधूनमधून व कर्माच्या शेवटी माझं स्मरण कर. असं सातत्याने करत गेलास की, हळूहळू मनाला तशी सवय लागेल आणि ते निमूटपणे तू सांगशील तसे ऐकेल. पुढेपुढे तर मन तुझ्या नकळत ही गोष्ट करू लागेल आणि त्यातून तुला मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. हा अवर्णनीय आनंद तू एकदा घेतलास की, तो वारंवार मिळावा असे तुला वाटू लागेल आणि त्यापुढे यापूर्वी तुला मोहात पडणाऱ्या सकाम कर्मांचे महत्त्व वाटणार नाही. अशा पद्धतीने वागल्यास तुझ्या बुद्धीवर अज्ञानामुळे जी धूळ बसलेली आहे ती झटकली जाईल व वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे वर्म तुझ्या लक्षात येईल. तुला कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी आकर्षण असावे एव्हढेच त्यांचा उद्देश होता. त्यातला तात्पुरता फायदा लक्षात आल्यावर तू आपोआपच निष्काम कर्माकडे वळावेस असा त्यामागील हेतू तुझ्या लक्षात आल्यावर तू स्वत:हून निष्काम कर्माकडे वळशील ही खात्री वेदांना आहे म्हणून वेदांची सुरुवात सकाम कर्माने होते.
मुळातच माणसाला काही ना काही फळ मिळवण्यासाठीच कर्म करायचे असते ह्या गोष्टीची इतकी सवय लागलेली असते की, काहीही फळ न मिळवता कर्म करायचे हे काही त्याच्या चटकन पचनी पडत नाही. त्याला ह्याचा अनुभव असतो की, मिळालेल्या फळातून त्याच्या देहाला सुख मिळते. आपण म्हणजेच हा देह आणि समोर दिसणारी दुनिया खरी आहे ह्या अज्ञानातच तो डुंबत असतो. त्यामुळे देहसुखासाठी कर्म करायचे असा त्याचा ठाम निश्चय असतो. त्यातच वेदांनीच सकाम कर्मे सांगितली आहेत मग ती तशी करण्यात गैर ते काय, अशी अज्ञानरुपी धूळ माणसाच्या बुद्धीवर गेले अनेक जन्म बसलेली असते. पण बाप्पा काय सांगतायत ते लक्षात घेतलं की, ती धूळ झटकली जाईल आणि सकाम कर्मे करण्यापासून मनुष्य मागे हटेल. वेदात सकाम कर्म करण्याबद्दलच्या वचनांचा समावेश का केलेला आहे हे लक्षात आल्यावर त्याचे तात्पुरते महत्त्व लक्षात आल्याने त्याचे मन सकाम कर्मे करण्यापासून दूर होऊन निष्काम कर्मातून मिळणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळवण्यासाठी आतुर होईल.
क्रमश: