महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्मयोगी विकारांना बळी पडत नसल्याने कर्मबंधनातून मुक्त होतो

06:30 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

मनुष्य हा कुटुंबकबिल्यात रमणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला संन्यास किंवा निरपेक्षतेनं कर्म करणं या दोन्ही गोष्टी फारशा पसंत नसतात. मग तो देवाला दोन्हीपैकी मी काय करू ते सांगा असे विचारतो पण देवही लगेच निर्णय न देता त्याला निरनिराळे पर्याय देऊन त्याच्या बुद्धीला चालना मिळेल अशी व्यवस्था करतात. देवाने माणसाला विचारस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य दिले असल्याने ते अंतिम निर्णय तुझाच राहील असं सांगतात. बाप्पांच्या मते कर्मयोग आणि कर्मसंन्यास ही दोन्ही मोक्षाची साधने आहेत पण त्यामध्ये कर्मयोग श्रेयस्कर आहे. कर्मसंन्यास घेण्यासाठी आंतरिक तीव्र वैराग्य तसेच यमनियम, शमदमादी दृढ साधन संपत्तीची आवश्यकता असते पण कर्मयोगाचे आचरण करणारा निरपेक्ष बुद्धीने लोककल्याणकारी कार्य करत असल्याने त्याला कर्म करतानाही आनंद मिळत असतो. हा आनंद निर्भेळ असल्याने त्याची गोडी काही औरच असते. त्यामुळे तो करत असलेले कर्म कौशल्याने करू शकतो.

Advertisement

सामान्य माणसाची कर्म केल्यावर त्याचं फळ म्हणून आपली आहे ही परिस्थिती बदलून आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते. म्हणजे माणसाला त्याच्या मनाप्रमाणे परिस्थितीत बदल हवा असतो. ही मन:स्थिती मोक्षाला प्रतिकूल असते. कर्मयोगी मात्र फळाच्या अपेक्षेने कर्म करत नसल्याने त्याला त्याच्या जीवनात कोणताही बदल अपेक्षित नसतो. त्यामुळे असा एक प्रश्न मनात येतो की, सामान्य मनुष्य फलत्याग करून कर्म करायला तयार होईल का? कारण कुठलंही कर्म फळाशिवाय करायचं ही कल्पना सहजासहजी पचनी पडणारी नाही. फळच मिळणार नसेल तर मी कर्म तरी कशाला करू? काम तर करायचं मग फळाची अपेक्षा केली तर चूक काय? असा विचार चटकन मनात येतो. हे जन्मोजन्मीचे संस्कार असतात. ते बदलून फळाशिवाय कर्म करायचा विचार मनात आणणं आणि त्याबरहुकूम कर्म करणं ही आव्हानात्मक बाब आहे. अर्थात बाप्पा हे जाणून आहेत म्हणून ते पुढील श्लोकात फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचं महत्त्व समजाऊन सांगत आहेत. त्यानुसार निरपेक्षतेने कर्म करणारा मनुष्य सुखदुख, रागद्वेष ह्यापैकी कोणत्याही विकारांना बळी पडत नसल्याने कर्माच्या बंधनातून मुक्त होतो.

द्वन्द्वदु:खसहोऽ द्वेष्टा यो न काक्षति किंचन ।

मुच्यते बन्धनात्सद्यो नित्यं संन्यासवान्सुखम् ।।3 ।।

अर्थ- जो मनुष्य, शीत-उष्ण इत्यादि द्वंद्वरूपी दु:खे सहन करतो, त्यांचा द्वेष करत नाही, कशाचीहि आकांक्षा धरीत नाही तो नित्य सुखी असणारा संन्यासी होऊन तत्काल बंधनापासून मुक्त होतो. बाप्पा म्हणतात, राजा असं बघ, जो मनुष्य फळाची अपेक्षा करून कर्म करतो तो सुरवातीपासून चिंतेत असतो. आपण ज्या पद्धतीने कर्म करतोय ती पद्धत आपल्याला हवं तसं फळ मिळवून देईल ना, अशी शंका त्याला सतावत असते. कर्म करत असतानासुद्धा फळाचेच विचार त्याच्या डोक्यात असल्याने कर्म करत असताना आवश्यक असलेली एकाग्रता त्याला साधता येत नाही. त्यामुळे तो कौशल्याने कर्म करू शकत नाही. कर्माला सुरवात करण्यापूर्वी इतर लोक काय करत आहेत, ह्याकडे त्याचे लक्ष वारंवार जात असते. त्यामुळे कधीकधी त्याच्या कर्माची सुरवातसुद्धा तो करू शकत नाही. कसं जमेल तसं कर्म केल्यावर अपेक्षित फळ मिळालं तर त्याला आनंद होतो आणि जर मिळालं नाही तर तो दु:खी होतो. बरं अपेक्षित फळ मिळालं तर त्यावर संतुष्ट न होता आणखीन काय केलं म्हणजे याहून जास्त फलप्राप्ती होईल असा विचार सुरू होऊन तो त्यानुसार पुढील कर्म करायला लागतो. एकूण फळाची अपेक्षा करून कर्म करणारा मनुष्य समाधानी होणं कठीण असतं.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article