साथीदारांवर गोळीबार करत जवानाची आत्महत्या
मणिपूरमधील घटना : चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील साजिक टँपकमध्ये आसाम रायफल्सच्या एका जवानाने मंगळवारी रात्री आपल्या सहा साथीदारांवर गोळीबार केला. यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हे सर्व सैनिक म्यानमार सीमेजवळ तैनात होते. घटनेनंतर जखमींना तात्काळ चुराचंदपूरच्या ऊग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे मणिपूर पोलिसांनी बुधवारी सांगितले. या गोळीबाराचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत, असे आसाम रायफल्सच्या आयजींनी स्पष्ट केले आहे. आसाम रायफल्समध्ये सर्व समाजातील सैनिकांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी ते एकत्र काम करत आहेत. जखमी सैनिक मणिपूरचे रहिवासी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर 17 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बेछूट जमावाने केलेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने आधी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला असता जमावामधून काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थौबलमध्ये संचारबंदी लागू केली होती.