एक दिव्य घटना, जिच्यामुळे...
वृंदावन येथील बांके बिहारी मंदीर जगप्रसिद्ध आहे. या मंदिराचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्या आहे. हे वैशिष्ट्या असे आहे, की या मंदिरासमोर दर दोन मिनिटांनी पडदा लावला जातो. हे मंदीर अत्यंत पुरातन आहे. पण असा पडदा लावण्याची प्रथा गेल्या 400 वर्षांमधील आहे. ही प्रथा का निर्माण झाली, याची एक रम्य कथा आहे. जी आजही पूर्वीइतकीच लोकप्रिय आहे. 400 वर्षांपूर्वी अशी पडदा लावण्याची प्रथा मुळीच नव्हती. त्यावेळी सदासर्वकाळ बांके बिहारी भगवानांचे दर्शन भक्तांना घेता येत होते. मात्र, एका घटनेमुळे ही प्रथा निर्माण झाली. बांके बिहारी भगवानांची मूर्ती इतकी सुरेख आहे, की भक्तांची दृष्टी तिच्यावरुन इतरत्र कोठेही जात नाही. भगवानही आपल्या भक्तदर्शनात इतके तल्लीन होत असत, की त्यांनाही अन्य कशाचे भान नसे.
बांके बिहारी हे भगवान श्रीकृष्णांचेच नाव. 400 वर्षांपूर्वी एक वृद्ध महिला भगवानांच्या दर्शनासाठी आली होती. त्या महिलेचा कोणीही नातेवाईक नव्हता. ती नि:संतान होती आणि अन्य कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. या वृद्ध वयात तिचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नव्हते. बांके बिहारीनांच आपला पुत्र मानावे आणि त्यांच्यातच लीन होऊन जावे असे तिच्या मनाने घेतले. त्याच तल्लीनतेत ती उभी राहिली आणि मूर्तीकडे जाऊ लागली. त्यावेळी चमत्कार घडला. स्वत: भगवान आपल्या स्थान सोडून पुढे आले आणि त्यांनी या वृद्धेला आपल्या बाहूंमध्ये घेतले. ते त्या वृद्धेच्या मागोमाग चालत मंदिराबाहेर जाऊ लागले. अखेर पुजाऱ्याने त्यांना विनंती करुन मंदिराबाहेर जाण्यापासून रोखले. तेव्हापासून दर दोन मिनिटांनी मूर्तीसमोर पडदा लावला जातो. जेणेकरुन भगवान कोणत्याही भक्ताच्या उत्कट भक्तीभावनेने भारित होऊन मंदीर सोडून जाऊ नयेत. ही कथा एक आख्यायिका आहे. पण ती भगवान आणि भक्त यांच्यातील उत्कट नात्याचे प्रतीक म्हणून एका प्रथेच्या रुपाने आजवर जपली जात आहे.