केजरीवालांना मारण्याचा रचला जातोय कट
आप खासदार संजय सिंह यांचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप रविवारी केला आहे. केजरीवालांच्या आरोग्याला धक्का पोहोचेल अशाप्रकारची पावले उचलली जात असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
केजरीवालांचा वैद्यकीय अहवाल पाहता त्यांना कधीही काहीही होऊ शकते. भाजप केजरीवालांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू पाहत आहे. केजरीवाल हे मिठाईचे सेवन करून स्वत:ची रक्तशर्करा पातळी वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा भाजपने यापूर्वी केला होता. आता केजरीवालांनी खाणे कमी केल्याचे भाजपकडून बोलले जात आहे, स्वत:च्या जीवाला धोका होईल असे कुणी का करेल? हा केजरीवालांचा जीव घेण्याचा कट असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
भाजपकडून प्रत्युत्तर
केजरीवाल हे जाणूनबुजून स्वत:चे वजन कमी करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार घरात तयार करण्यात आलेले भोजन अरविंद केजरीवालांना मिळत आहे, परंतु ते जाणूनबजून स्वत:चा आहार कमी करत आहेत, जेणेकरून स्वत:चे वजन कमी होईल आणि तिहारमध्ये आपला छळ होत असल्याचे नाटक ते न्यायालयासमोर करू पाहत असल्याचा प्रतिआरोप भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
केजरीवालांचे हे नाटक फार दिवस चालणार नाही. केजरीवाल हे घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवालांनी दिल्लीची अधोगती केली आहे. दिल्लीतील हवेत फैलावलेल्या विषासाठी केजरीवाल जबाबदार आहेत. दिल्लीच्या पाण्यातील विषासाठी आम आदमी पक्ष जबाबदार आहे. आम आदमी पक्षाचे प्रशासन पूर्णपणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चालत आहे. आप सरकारने दिल्लीला केवळ लुटण्याचे काम केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केली आहे.