अल्पकालीन अधिवेशनात सर्वसमावेशक चर्चा अशक्य
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचे मत : अनेक मुद्यांवर व्यापक चर्चा आवश्यक
पणजी : राज्याचे वाढते कर्ज, पायाभूत सुविधांशी निगडीत समस्या, भोम महामार्गाचा प्रश्न, रोजगार, आरोग्य सेवेतील कमतरता, ढासळत चाललेले पर्यटन, वारसा स्थळांचे जतन, यासारखे शेकडो गंभीर प्रश्न, समस्या आणि आव्हाने राज्यासमोर असताना अल्प कालावधिचे विधानसभा अधिवेशन आयोजित केल्याबद्दल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशाप्रकारे अधिवेशनांचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आल्यास सरकारची प्रगती आणि उत्तरदायित्वावर सर्वसमावेशक चर्चा करणे शक्यच होणार नाही, असे मत त्यांनी मांडले. बफर झोनमुळे लोकांना पाणथळ जागांच्या वापरावर येणाऱ्या मर्यादा, रेन्ट अ कारची समस्या, मडगाव पालिकेचा गलथान कारभार, गोव्यातील जीआय टॅग प्राप्त वस्तूंचे संरक्षण, पणजी-मडगाव मार्गावर बसेसचा तुटवडा, कृषी अनुदान वितरणास होणारा विलंब, महिला व मुलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार यासारख्या व्यापक मुद्यांवर सरदेसाई यांनी प्रकाश टाकला.
किनारे स्वच्छता निविदांची छाननी आवश्यक
पर्यटन खात्यातील भ्रष्टाचारावर बोलताना त्यांनी 90 कोटींच्या समुद्रकिनारे स्वच्छता निविदांची छाननी करण्याची मागणी केली. परंपरेने किनारी भागात वास्तव्य करणाऱ्या राज्यातील स्थानिकांच्या हिताचे रक्षण करण्यात सरकारला आलेल्या अपयशावरही त्यांनी बोट ठेवले. सरकार सध्या सोहळ्यांच्या आयोजनात मग्न असल्यामुळे स्थानिकांना मात्र बेरोजगारी, महागाई यासारख्या समस्या आणि धोक्यांचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.