खानापुरात बंद घर फोडले
10 तोळे सोने, 20 तोळे चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
खानापूर : मारुतीनगर, खानापूर येथील बंद घराचा दरवाजा तोडून 10 तोळे सोने आणि 20 तोळे चांदीच्या दागिन्यांसह रोख पाच हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे सोमवार दि. 17 रोजी उघडकीस आले आहे. याबाबत माहिती अशी की, माऊतीनगर येथील बसवंत वैजू निलजकर हे सैन्यदलात सेवा बजावत आहेत. त्यांनी माऊतीनगर येथे एक वर्षापूर्वी घर बांधले आहे. या घरात त्यांची पत्नी नीता निलजकर या मुलाला घेऊन राहत होत्या. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्या आपल्या माहेरी जळगा येथे गेल्या होत्या. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश करून कपाटातील 10 तोळे सोने आणि 20 तोळे चांदी, तसेच रोख पाच हजार रुपये लंपास केले आहेत.
गेल्या आठ दिवसांपूर्वी नीता या आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्या सोमवारी दुपारी परत आल्या असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्यांनी याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली आणि आपल्या वडिलांना बोलावून घेऊन खानापूर पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दिली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी घटनास्थळी पाहणी करून श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने घरातून नदीपर्यंत माग काढला. मात्र तिथेच घुटमळत राहिले. ठसेतज्ञांनी ठसे घेतले असून पोलीस चोरीचा तपास करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी फायदा घेतला आहे. मात्र चोरी केव्हा झाली आहे, हे स्पष्ट झालेले नाही.