For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वास्को जळीत प्रकरणी त्वरित गुन्हा नोंद व्हावा : आवदा व्हियेगस

03:09 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
वास्को जळीत प्रकरणी त्वरित गुन्हा नोंद व्हावा   आवदा व्हियेगस
Advertisement

गुन्हा नोंद करण्यास उशिर म्हणजे न्याय मिळण्यास अडचणी

Advertisement

मडगाव : जेवढ्या उशिरा गुन्हा नोंद केला जातो तेवढे ते प्रकरण कमकुवत होते व पीडितांना न्याय मिळण्यास कठीण होते. कळंगुट येथील सिद्धी नाईक प्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा नोंद झाला व ते प्रकरण अजूनही जैसे थे आहे. वास्कोतील शिवानी राजावत जळीतप्रकरणी असे होऊ नये, यासाठी वास्को पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेल्या तक्रारीनुसार लवकरात लवकर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी केली आहे. आवदा व्हिएगस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 18 नोव्हेंबर रोजी वास्को येथे गॅस स्फोटात चार महिन्याची गर्भवती असलेल्या शिवानी राजावत (26) व तिची आई जयदेवी चौहान (50) यांचा मृत्यू झाला. शिवानीचा भाऊ शुभम चौहान यांनी शिवानी हिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला.

आई जयदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी मुलाने तत्काळ दावा केला व मध्यप्रदेशातील मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, हा अपघात आहे की, घातपात अशी शंका असल्याने शिवानीचा मृतदेह कुटुंबियांना दिलेला नव्हता. 7 डिसेंबर रोजी शिवानीचा भाऊ शुभम गोव्यात आला व वास्को पोलिसांना तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांकडे त्यांनी शिवानीचा मृत्यू हा हुंड्यासाठी करण्यात आलेला खून असल्याचा दावा केला व 14 पानी तक्रार दाखल केली. वास्को पोलिसांनी शुभमला दोन तास ताटकळत ठेवत तक्रार घेण्यास अनुत्सुकता दाखवली. बायलांचो एकवोटतर्फे उपविभागीय अधीक्षक सलीम शेख यांची भेट घेण्यात आली. शेख यांनी सांगितल्यानंतर शुभम यांनी दिलेली तक्रार वास्को पोलिसांकडून स्वीकारण्यात आली. तर दुसऱ्याच दिवशी उपविभागीय न्यायदंडाधिकारी भगवंत करमली यांनीही 5 तास शुभमचा जबाब नोंद केला व वास्को पोलिसांना याप्रकरणी अहवाल सादर केला जाईल, असे सांगण्यात आले.

Advertisement

20 दिवसानंतर झाले शिवानीवर अंत्यसंस्कार

न्यायदंडाधिकारी करमली व उपविभागीय पोलीस अधीक्षक सलीम शेख यांनी निष्पक्ष तपासाची ग्वाही दिल्यानंतर शुभम व कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची परवानगी दिली व घटनेच्या 20 दिवसांनी शिवानीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गेव्यातच झाले. यावेळी सासरची मंडळीही उपस्थित होती. शिवानीचा भाऊ शुभम याने पुराव्यासह तक्रार सादर केलेली असून त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्याची गरज आहे. नाहीतर तक्रारदाराला न्यायालयात जावे लागेल व त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना गुन्हा नोंद करावा लागेल. पोलिसांनी तपासासाठी आवश्यक वेळ घ्यावा. पण, गुन्हा नोंद करण्यात चालढकल करू नये. बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवदा व्हियेगस यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.