99 टक्के कामे पाच वर्षांत होणार पूर्ण
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन : पुढील पाच वर्षांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन,विरोधकांच्या टीकेचा घेतला खरपूस समाचार
पणजी : भाजपने संकल्पपत्र या नावाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यातील 99 टक्के कामे पाच वर्षांत पूर्ण होतील, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्ती या चार सूत्रांवर लक्ष केंद्रित करून जाहीरनामा तयार करण्यात आला असून तो तयार करताना लाखो लोकांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत. मोदी सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे. भारत जागतिक स्तरावर तीन क्रमांकावर येणार या दृष्टीनेही मोदी सरकार काम करीत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल गुरुवारी येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्या सोबत दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे, उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित हेते. नरेंद्र मोदी हे आज जागतिक नेते बनले आहेत. विकसीत भारत घडविण्यासाठी राज्यातील जनता भाजपच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देईल, यात कोणतीही शंका नाही. ‘अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार’ होणारच आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
निवडणुकीनंतर डिबेट करण्यास या...
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात कुणी पडूच नये. ज्यांना डिबेट करायचे असेल त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर डिबेट करायला आपण स्वत: तयार आहे, असे प्रति आव्हान त्यांनी दिले आहे. केवळ अलिकडे आपण जरा व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नाही. परंतु गोव्यातील निवडणुका उरकल्यानंतर आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल. त्यामुळे 7 मे नंतर केव्हाही आपण खुल्या चर्चेसाठी तयार आहे, असे ते म्हणाले.
म्हापसा अर्बन फाईल केव्हाही उघडू शकतो
म्हापसा अर्बन बँकेत सुमारे 4 लाख गोवेकरांनी पैसे गुंतवले होते. त्यांच्या कष्टाचे पैसे बुडवले गेले. याप्रकरणी आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. सध्या हे प्रकरण केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाकडे (सीआरसीएस) प्रलंबित आहे. गरज पडल्यास याची फाईल पुन्हा उघडता येऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कुणालाही धमकी देत नाहा,r तशी आम्हाला सवयदेखील नाही. मात्र म्हापसा अर्बन बँकेतील भागधारकांचे पैसे कोणी बुडवले? कसे बुडवले? हे देखील विरोधी पक्षांनी सांगावे. गोव्यातल्या लोकांनी स्वत:च्या खिशातील कष्टाने जमवलेले पैसे बँकेत ठेवले होते. त्यावेळी ठेवलेल्या 35 हजार ऊपयांची किंमत आता तीन लाख पेक्षा जास्त आहे. आपले पैसे कोणी बुडवले हे गोव्यातील लोक विसरलेले नाहीत. पैसे बुडवणाऱ्यांना लोकांची हाय लागली आहे. ते संबंधितांना धडा शिकविणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
थोडेफार पैसे देण्याचा प्रयत्न
सरकारने या बँकेवर प्रशासक नेमून लोकांचे थोडेफार पैसे परत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्यावर किंवा आमच्या पक्षावर बोलणाऱ्या लोकांनी या बँकेविषयी देखील बोलावे. काही उमेदवारांनी लोकांचे पैसे बेकायदेशीर मार्गाने लुटले आहेत. काही लोकांनी सत्तेचा दुऊपयोग केला आहे. आम्ही राजकारणाचा वापर स्वत:साठी केलेला नाही. आमच्यासाठी देश आणि राज्य प्रथम आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भाजप ब्रॅंड सर्वात मोठा
भाजप ब्रँड सर्वात मोठा असून तो देशव्यापी आणि सर्वव्यापी आहे असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. पल्लवी धेंपे या उमेदवार म्हणून भाजपची निवड आहे. त्यांच्या कामाची आणि लोकप्रियतेची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे. धेम्पो उद्योग समूह मागील अनेक वर्षांपासून गोव्यात यशस्वीपणे कार्यरत आहे आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम आहे. त्यामुळे धेम्पो समूहाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निवड़णूक शिर्षकगीताचे अनावरण करण्यात आले. गोव्यातील जाहीनामा लवकरच प्रकाशित केला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री अमित शहा 24 रोजी गोव्यात
भाजपचा पहिला प्रचार टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पाही अर्धाअधिक पूर्ण झाला आहे. दोन्ही मतदारसंघांतून भाजप उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. तिसऱ्या टप्प्यात कोपरा बैठका व जाहीर सभा होतील. जाहीरसभेत मार्गदर्शन करण्यासाठी 24 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येतील, तर 25 रोजी विनोद तावडे गोव्यात दाखल होतील. याशिवाय अन्य केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे नेते गोव्यात येतील असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.