‘आलमट्टी’तून 70 हजार क्युसेक विसर्ग
महाराष्ट्रातील पावसामुळे पाण्यात वाढ : पुढील काळात विसर्ग वाढणार
वार्ताहर/विजापूर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आलमट्टी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गुरुवारी 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये करण्यात आला आहे. सकाळी 50,000 क्युसेक इतका असलेला विसर्ग संध्याकाळी 7 वाजता 70 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, राधानगरी, दूधगंगा, वारणा आणि इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे कळळोळ बॅरेजकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग वाढवण्यात आला आहे. 519.60 मीटर इतक्या कमाल उंचीच्या जलाशयात सध्या 515.48 मीटर इतक्या उंचीपर्यंत पाणी साठवले गेले आहे.
जलाशयात एकूण 67.665 टीएमसी इतका पाणीसाठा असून ते 54 टक्क्यांपर्यंत भरले आहे. संध्याकाळपर्यंत जलाशयात 78,250 क्युसेक इतक्या पाण्याची आवक झाली आहे. पाण्याची आवक अधिक झाल्यास, विसर्ग अजून वाढवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जून महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने, जरी जलाशय 54 टक्के भरलेले असले तरीही, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आला आहे. जुलैपासून जलाशय पूर्ण भरण्यासाठी पावले उचलली जातील. सध्या पुराचा धोका लक्षात घेऊन विसर्ग वाढवण्यात आला आहे, असे केबीजेएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जलाशयाच्या उजव्या बाजूच्या आलमट्टी वीजनिर्मिती केंद्रातून 42,500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रातील सर्व 6 युनिट्स कार्यरत आहेत. सध्या 225 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे, अशी माहिती केपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांनी सतर्क रहावे
सध्या पुराचा कोणताही धोका नाही. नदीकाठच्या गावांमध्ये लोक व जनावरांनी नदीच्या दिशेने जाऊ नये, नदीत उतरणे टाळावे यासाठी इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार ए. डी. अमरवाडगी यांनी दिली आहे.