आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 56बळी
मध्यप्रदेश-राजस्थानसह 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
► वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील पुरामुळे गुऊवारी 8 जणांचा मृत्यू झाला असून चालू पावसाळी हंगामातील मृतांची संख्या 56 वर पोहोचली आहे. 29 जिल्ह्यातील 21 लाख 13 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील पुरात बुडून आतापर्यंत एकूण 31 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तर 82 प्राण्यांना महापुरातून वाचवण्यात यश आले आहे.
भारतीय हवामान विभागाने जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, उत्तर पश्चिम बंगाल, अऊणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये मध्यम व सर्वसाधारण पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये उष्णतेची लाट
एकीकडे देशाचा उर्वरित भाग मान्सूनच्या पावसाने चिंब झालेला असतानाच दुसरीकडे उन्हाळ्यातही थंड असणारे काश्मीर खोरे सध्या होरपळत आहे. श्रीनगर असो वा गुलमर्ग, सोनमर्ग असो किंवा अमरनाथ यात्रा मार्ग आदी बहुतांश प्रदेश उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. तापमानाचा पारा सातत्याने 32 अंशांच्या वरच आहे. गेल्या 7 दिवसांपासून पहिल्यांदाच श्रीनगर 35 अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खोऱ्यातील शाळांना 17 जुलैपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये पूल कोसळून दुर्घटना
उत्तराखंडमधील गंगोत्री-गोमुख मार्गावरील चिरबासा ओढ्याला आलेल्या पुरामुळे त्यावर बांधलेला लाकडी पूल तुटला. या प्रवाहात दिल्लीचे दोन कंवारे वाहून गेले. 8 जणांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आहे, तर इतर 32 जणांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गंगोत्रीपासून नऊ किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिमनदी वितळल्याने ओढ्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली होती.