For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुलै महिन्यात 54 जणांना डेंग्यूची लागण

11:34 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुलै महिन्यात 54 जणांना डेंग्यूची लागण
Advertisement

शहरात आतापर्यंत एकूण 82 जणांना डेंग्यू : मनपा-आरोग्य विभागाकडून गांभीर्याने दखल : औषध फवारणीसह घरोघरी जाऊन सर्वेक्षण

Advertisement

बेळगाव : डेंग्यूने साऱ्यांनाच हैराण केले आहे. डेंग्यूने अनेकजण त्रस्त झाले असून जुलै महिन्यात शहरातील 54 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 82 जणांना डेंग्यूची लागण झाली असून जिल्हा आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत खबरदारी घेतली आहे. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशानुसार  सर्वत्र औषध फवारणी व संशयित रुग्णांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डेंग्यूच्या आजाराने अनेकजण त्रस्त झाले आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे काहीजणांना प्राणही गमवावा लागला आहे. डेंग्यू आजाराबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेनेही तितकेच सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. डासांपासून होणाऱ्या या आजाराविरोधात शहरातील सर्वच प्रभागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. असे असले तरी पाण्याचा साठा करू नये, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. पाण्याचा अधिक दिवस साठा केल्यानंतर त्याच स्वच्छ पाण्यातून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. तेव्हा प्रत्येकांनीच याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. किमान दोन दिवसांतून एकदा पाणीसाठा पूर्णपणे काढून नव्याने पाणी भरावे, असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आपल्या परिसरातील पाण्याचे डबके असो किंवा गटारी असो, त्याठिकाणी पाणी साचणार नाही याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जुलै महिन्यामध्ये तब्बल 54 डेंग्यू रुग्ण आढळले आहेत.

ऑगस्ट महिन्यातील केवळ सहाच दिवसांत 7 रुग्ण डेंग्यूने त्रस्त झाले आहेत. हा आजार अधिक फैलावत चालला आहे. त्यामुळे काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. वास्तविक एलअॅण्डटी कंपनीने पाणीपुरवठाही रोजचा रोज करणे गरजेचे आहे. याचबरोबर शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्तांना विचारले असता, संबंधित कंपनीला सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात या कंपनीकडून योग्यप्रकारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी जनतेतून करण्यात येत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे जनता पाण्याचा साठा करीत आहे. तेव्हा याबाबत महानगरपालिका व एलअॅण्डटी कंपनीनेही विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. याचबरोबर जनजागृतीही केली जात आहे. संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने रक्त तपासणी करण्यात येत आहे. जर रुग्ण  पॉझिटिव्ह आढळला तर तातडीने त्या परिसरात फवारणीसह इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

Advertisement

काळजी घेण्याचे आवाहन

शहरातील वंटमुरी कॉलनी, वीरभद्रनगर, रुक्मिणीनगर, गांधीनगर, न्यू गांधीनगर, शिवाजीनगर, खासबाग परिसरात रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे त्या परिसरात जास्त लक्ष दिले जात आहे. मात्र इतर ठिकाणीही रुग्ण आढळत असून सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.