500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये
फिरकीपटू आर अश्विनवर भेटवस्तूंचा वर्षाव : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अनोखा गौरव
वृत्तसंस्था/ चेन्नई
नुकतीच भारत व इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अफलातून कामगिरी करताना सर्वाधिक 26 बळी घेतली. विशेष म्हणजे, याच मालिकेत अश्विनने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. या मालिकेतून कारकिर्दीतील 100 कसोटी सामने आणि 500 कसोटी बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा अश्विन हा जगातील नववा गोलंदाज कसोटीत 500 बळींचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. या शानदार कामगिरीसाठी तामिळनाडू क्रिकेट संघटनेकडून रविवारी त्याचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला.
इंग्लंडविरुद्ध मालिका अश्विनसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरली. कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना व 500 बळींचा टप्पा त्याने या मालिकेत गाठला. आपल्या जादुई फिरकीने त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: नाकीनऊ आणले. रविवारी या दिग्गज फिरकीपटूचा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने गौरव केला आहे. यावेळी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनला 1 कोटी रुपयांचा धनादेश तसेच अनेक भेटवस्तू दिल्या. विशेष म्हणजे, 500 विकेट्स पूर्ण केल्याबद्दल 500 सोन्याची नाणी, एक चांदीची ट्रॉफी, एक विशेष ब्लेझर अश्विनला देण्यात आले. या सन्मान सोहळ्यात अश्विनचे कुटुंबिय उपस्थित होते. दरम्यान, अश्विनच्या या सत्कार सोहळ्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते.
आयुष्यभर धोनीचा ऋणी राहिन
याच सोहळ्यात अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धोनीबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, मला माझ्या मनापासून धोनीचे आभार मानायचे आहेत. त्याने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याचा नेहमीच ऋणी राहीन. 2008 मध्ये मी चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूममध्ये महान खेळाडू मॅथ्यू हेडन आणि धोनीला भेटलो. त्यावेळी मी काहीच नव्हतो आणि मुथय्या मुरलीधरन ज्या संघात होता त्या संघात मी खेळत होतो. धोनीने मला नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली. हे माझ्यासाठी अविस्मरणीय असे आहे. याबद्दल मी त्याचा कृतज्ञ आहे, असेही तो म्हणाला.
यावेळी अश्विनने मनोगत व्यक्त करताना तामिळनाडू क्रिकेट संघटनेचेही आभार मानले. टीएनसीएमुळे माझ्या कारकिर्दीतीला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली असल्याने त्याने यावेळी नमूद केले.