पन्नास महागडे मोबाईल सनबर्न महोत्सवात लंपास
29 मोबाईल संचासह 25 लाख रुपये जप्त, सात संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी/ म्हापसा
वागातोर येथे सुरू असलेल्या सनबर्न महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुंब्रा महाराष्ट्र येथील सराईत चोरट्यांनी पन्नासपेक्षा अधिक महागडे मोबाईल लंपास केले. यापैकी हणजूण पोलिसांनी चोरट्यांकडून 29 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले. हे चोरटे मुंब्रा महाराष्ट्र येथून विमानाने खास मोबाईल चोरीच्या उद्देशाने गोव्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपअधीक्षक जिवबा दळवी, हणजूण पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई, उपस्थित होते.
हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्यांमध्ये मुंब्रा महाराष्ट्र येथील अबेदुल्लाह सामीउल्ला खान (43), ओवेज अख्तर (31), सोहेल मेमन (32), अब्दूल रहमान नियामद अली खान (44), सदाम अली सत्तार अली सैय्यद (30), महम्मद झिशान नजीर खान (21), सोहेल इम्रान शेख (22) यांचा समावेश आहे. आतापर्यंत या कारवाईत संशयितांकडून 29 मोबाईल व सुमारे 25 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी या मोबाईल चोरीचा छडा लावण्यासाठी पथकाची नियुक्ती केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशल देसाई, उपनिरीक्षक साहिल वारंग, अशिष परब, शिपाई सत्यंद्र नास्नोडकर, महेंद्र मांद्रेकर, सुदेश केरकर, शांबा शेटगावकर, रुपेश आजगावकर, लक्ष्मण सावळ देसाई, आदर्श नागवेकर, मयूर घाडी, अभिषेक कासार, अनिकेत पेडणेकर, किशन बुगडे, दीपेश चोडणकर, अमीर फडते, शाणू रावत आदींनी याकामी चोख कामगिरी बजावली.
आज सर्वत्र पोलीस तैनात करणार!
दरवर्षी सनबर्न तसेच आज 31 डिसेंबरच्या धामधुमीत चोरट्यांची टोळी मोबाईल लंपास करण्याच्या उद्देशाने खास येऊन 1 तारखेला पळ काढतात. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून काही जणांना ताब्यात घेतले. मात्र नेमके किती चोरटे दाखल झाले आहेत, याबाबत माहिती उपलब्ध नाही. सखोल चौकशीअंती सर्वकाही उलगडा होईल, असेही अधीक्षक निधीन वाल्सन यांनी स्पष्ट केले. मात्र यावर्षी आलेल्या चोरट्यांची टोळी नवीन असून गतसाली आलेल्या चोरट्यांचा यात समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिवबा दळवींनी केलेल्या कारवाईचे समर्थन
सनबर्नच्या पहिल्या दिवशी उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी आवाजाची पातळी वाढविल्या प्रकरणी एक कार्यक्रम बंद पाडण्याच्या केलेल्या कारवाईचे अधीक्षक वाल्सन यांनी समर्थन केले. मात्र काही समाजमाध्यमांनी त्याला वेगळे स्वरुप दिले, असे सांगून याबाबत उपअधीक्षक दळवी यांचे त्यांनी अभिनंदन केले................................