‘400 पार’ निश्चितपणे होणार !
‘या लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे ध्येय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ठेवले आहे. मतदानाचे दोन टप्पे झाले असून आम्ही आमच्या ध्येयाकडे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहोत. 4 जूनला मतगणना होणार असून त्यादिवशी दुपारी साडेबारा वाजता याची सर्वांना प्रचीती येण्यास प्रारंभ होईल,’ असा आत्मविश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी प्रथम दोन टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी मागच्या निवडणुकीपेक्षा काही प्रमाणात कमी आहे. मात्र, या बाबीचा कोणत्याही विपरीत परिणाम भारतीय जनता पक्षाच्या यशावर होणार नाही. आमच्या सर्व मतदारांनी त्यांचे काम चोखपणे पार पडले आहे. विरोधी पक्षांच्या अपेक्षा या निवडणुकीत पूर्ण होणार नाहीत, याची त्यांच्या मतदारांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकजण मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत, अशी कारणमीमांसा त्यांनी एका प्रश्नावर केली.
आमचे विश्लेषण सविस्तर
आतापर्यंतच्या मतदानाचे सविस्तर विश्लेषण आम्ही केले आहे. मतदानकेंद्रनिहाय माहिती आम्ही जमवतो आणि नंतर विश्लेषण करतो. आम्हाला आमच्या विजयाविषयी पूर्ण शाश्वती आहे. विरोधी पक्ष मात्र निराश झालेले दिसून येतात. कारण त्यांनाही त्यांची परिस्थिती माहीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दहा वर्षांमध्ये विक्रमी कार्य
गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही देशात विविध क्षेत्रांमध्ये विक्रमी कार्य केले आहे. गरीबांसाठीच्या योजनांपासून पायाभूत सुविधांपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी पेलेली आहे. लोकांनाही याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. मात्र, आमचे कार्यकर्ते पक्षाला जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.