झुआरीवरील टॉवर्स 297 कोटींचे! देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुलाचे उद्घाटन
कंत्राटदारच करणार गुंतवणूक : सरकार देणार 50 हजार चौ.मी जमीन
पणजी : नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या झुआरी नदीवरील केबल स्टेड पुलाच्या दोन्ही खांबांवर आता निरीक्षण सुविधेसह जुळे मनोरे उभारण्याचे काम प्रारंभ होणार असून सदर कंपनी स्वखर्चाने हे मनोरे उभारणार व त्याची वसुलीही स्वत:च करणार आहे. या गुंतवणुकीसाठी मदत किंवा बक्षिसी म्हणून सरकार या कंपनीला वेर्णा भागात तब्बल 50 हजार चौ. मी. जमीन देणार आहे. पुढील 50 वर्षात सदर खर्च वसुल करण्यात येणार आहे. गोव्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तथा देशातील आपल्या पद्धतीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ठरलेल्या या पुलाचे उद्घाटन होऊन तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुलाही झाला आहे. सदर जुळे मनोरे उभारण्याचे कामही विद्यमान बांधकाम करणारी कंपनीच करणार आहे. या प्रकल्पात ती कंपनी 297 कोटी ऊपये गुंतवणूक करणार आहे.
ही गुंतवणूक वसुल करण्यात त्यांना मदत म्हणून सरकारने 50 हजार चौ. मी. जमीन देण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पासंबंधी कंत्राटदारासोबत कराराच्या अटी केंद्रीय स्तरावर झालेल्या विविध बैठकांनंतर निश्चित करण्यात आल्या आहेत. कंत्राटदार एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्यामुळे तिच्या वसुलीसाठीही तेवढाच मोठा कालावधीही लागणार आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकार 50 हजार चौ. मी. जमीन देत असून त्यात एखादा प्रकल्प स्थापन करून त्या कमाईद्वारे स्वत:च्या गुंतवणुकीचा काही प्रमाणात परतावा प्राप्त करू शकेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. सरकारकडे वेर्णा भागात यापूर्वीच संपादित करण्यात आलेली जमीन उपलब्ध आहे. सदर जमीन महामार्ग बांधकामांसाठी म्हणून संपादित करण्यात आली होती, परंतु गत कित्येक दशकांपासून ती विनावापर आहे. सदर जमीन ताब्यात मिळाल्यानंतर संबंधित कंत्राटदार तेथे एखादे लक्झरी हॉटेल किंवा मनोरंजन पार्क स्थापन करू शकणार आहे. त्याद्वारे स्वत:च्या गुंतवणुकीची वसुली करू शकणार आहे.
तीन वर्षांत मनोरे पूर्णत्वास येण्याची शक्यता
झुआरी नदीवरील नवीन आठ पदरी केबल स्टेड पूल सुमारे 1500 कोटी ऊपये खर्च करून उभारण्यात आला आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकारने दिला असून पूल बांधताना आधीच त्याच्या दोन्ही खांबांवर निरीक्षण टॉवरवजा जुळे हॉटेल्स बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. हे टॉवर्स बांधून झाल्यानंतर गोव्याच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. वैशिष्ठ्यापूर्ण असे हे टॉवर्स पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची तयारी कंत्राटदाराने ठेवली आहे. त्यायोगे स्वत:च्या गुंतवणुकीची वसुली शक्य तेवढ्या लवकर प्रारंभ करू शकणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळासारखे आकर्षण ठरणाऱ्या या टॉवर्सची उंची अंदाजे 110 मीटर असेल. त्याचे डिझाईन अद्याप निश्चित झालेले नसले तरीही त्यावरील निरीक्षण टॉवरवजा जुळ्या हॉटेल्समध्ये एका वेळी प्रत्येकी 500 लोकांना सामावून घेण्याची शक्यता असेल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.