शहरात 27 अग्निशमन वाहनांसह 250 जवानांची नियुक्ती
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी : परजिल्ह्यातून मागविले बंब
बेळगाव : दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर बेळगावातही हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली असून, यावेळी अग्निशमन दलाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. यंदा सुवर्णसौधसह शहरात तब्बल 27 अग्निशमन दलाची वाहने तैनात करण्यात आली असून, 250 कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये शक्तीशाली स्फोट झाल्याने अनेकजणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) कडून केला जात आहे. तपासादरम्यान वेगवेगळ्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 26 जानेवारी दिवशी लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणण्याचा बेत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर बेंगळूर येथील परप्पन अग्रहार आणि हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कुख्यात गुन्हेगारांचा दहशतवाद्यांशी संपर्क असल्याचेही पुढे आले आहे.
या पार्श्वभूमीवर अलिकडेच एनआयएच्या पथकाकडून बेंगळूर परप्पन अग्रहार कारागृहावर छापा टाकून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगणारा जयेश पुजारी हा कैदी दहशतवाद्यांच्या गळाला लागला आहे. त्यामुळे बेळगाववरही एनआयएचे विशेष लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेतली जात आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार बेळगावात अधिवेशनामुळे हायअलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
आगीसारख्या घटना घडू नयेत, एखाद्यावेळेस आगीची घटना घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी दरवर्षीपेक्षा यंदा अग्निशमन दल अलर्ट झाले आहे. सुवर्णसौध परिसरात एकूण 18 वाहने अग्निशमनदलाच्यावतीने तैनात केली जाणार आहेत. तर शहरातील संवेदनशील ठिकाणीदेखील वाहने ठेवली जाणार आहेत. एकूण 27 वाहने वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली जाणार आहेत. त्याचबरोबर 250 जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. दावणगेरे, बळ्ळारी, विजापूर, बागलकोट, धारवाड, हुबळी या जिल्ह्यातून अतिरिक्त पाण्याचे बंब मागविण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी पोलीस वसाहत परिसरात पाण्याचे बंब ठेवण्याचे पत्र अग्निशमन दलाला दिले आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीतही पाण्याचे बंब तैनात केले जाणार आहेत. एकंदरीत गतवर्षीपेक्षा यंदा अग्निशमन दलाच्यावतीने अधिक खबरदारी घेण्यात आली आहे.
पोलीस वसाहत परिसरातही अग्निशमन वाहने
दरवर्षीच्या तुलनेत यंदा अग्निशमन दलाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुवर्णविधानसौध आणि शहरात एकूण 27 अग्निशमन वाहने तैनात असणार आहेत. तर 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी केलेल्या शिफारशीनुसार पोलीस वसाहत परिसरातही अग्निशमन वाहने असणार आहेत.
- रंगनाथ, जिल्हा अग्निशमन अधिकारी.