Sangli : सांगलीत 25 टन फळे, भाजीपाला दिल्लीला रवाना
सांगली पॅटर्नचा एक महत्वाचा टप्पा
सांगली : जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने रविवारी पहाटे दिल्लीला रवाना करण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जनसुराज्य पक्षाचे नेते समीत कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह अधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. या वॅगनमुळे सांगली पॅटर्नचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत जिल्ह्यातील २५ टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडली. आज पहाटे सब्बा पाच वाजता 'दर्शन एक्सप्रेस" रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठविण्यात आली. मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे व समित कदम यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून "दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. २३शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हा टप्पा पूर्ण करता आला नसता, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून जिल्हाधिकारी काकडे यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार व त्यांचे सर्व अधिकारी पाटील, माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली.