जेईई-मेनमध्ये 23 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयआयटी आणि इतर संलग्न शिक्षण संस्थाची प्रवेश परीक्षा असणाऱ्या जेईई-मेनमध्ये यंदा 23 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेच्या निर्णयाची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. 100 पैकी 100 गुण मिळविणाऱ्यांमध्ये तेलंगणाच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यातील 7 विद्यार्थ्यांनी हे ध्येय साध्य केले आहे.
यंदा या परीक्षेला देशभरातून 11 लाख 70 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या प्रवेश परीक्षेचे दोन भाग असून प्रथम भाग जेईई-मेन म्हणून ओळखला जातो. दुसरा भाग जेईई-अॅडव्हान्स म्हणून ओळखला जातो. दोन्ही भागांमधील परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आआयटी संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.
आंध्रप्रदेशचेही यश
100 पैकी 100 गुण मिळविणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी तीन, हरियाणा आणि दिल्लीचे प्रत्येकी दोन, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकाचा प्रत्येकी 1 अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी असून एकाही विद्यार्थिनीला मात्र यंदा 100 पैकी 100 गुण मिळविण्याचा मान मिळवता आलेला नाही, अशीही माहिती परीक्षा मंडळाने पत्रकारांना दिली आहे.
परदेशांमध्येही परीक्षा केंद्रे
ही प्रवेश परीक्षा विदेशांमध्येही घेतली जाते. यंदा मनामा, दुबई, दोहा, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजाह, सिंगापूर, कुवेत शहर, क्वालालंपूर, लागोस, अबुजा, कोलंबो, जकार्ता, मॉस्को, ओटावा, पोर्ट लुईस, बँकॉक आणि वॉशिंग्टन डीसी या विदेशातील केंद्रांवरही घेण्यात आली होती. परदेशांमध्येही अलिकडच्या काळात या परीक्षेची लोकप्रियता वाढत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.