20 हजार बेकायदा रेशनकार्डधारकांना दणका
अन्न-नागरी पुरवठा खात्याची कारवाई : बोगस रेशनकार्डे रद्द
बेळगाव : खोटी कागदपत्रे पुरवून रेशनकार्ड मिळविलेल्या 20 हजार बेकायदेशीर लाभार्थ्यांना दणका बसला आहे. संबंधितांची रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याने ही कारवाई केली आहे. बोगस बीपीएल कार्डे रद्द करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही अनेकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बेकायदेशीर रेशनकार्डे मिळविली आहेत. अशांवर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील 20 हजार कुटुंबीयांची बेकायदेशीर रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. शिवाय त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.
सरकारी नोकर, आयकर भरणारे, चारचाकी वाहने असलेले, शहरात एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे घर असलेल्यांवर कारवाई झाली आहे. शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून रेशनचा लाभ घेत असलेल्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे. बेकायदेशीर कार्डधारकांचा शोध घेऊन कार्डे रद्द केली जात आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खातेदेखील अॅक्शनमोडवर आल्याचे दिसत आहे. दारिद्र्या रेषेखालील जनतेला धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून दरमहा मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी काहींनी खोटी कागदपत्रे सादर करून बीपीएल रेशनकार्डे मिळविली असल्याचे समोर आले आहे.
रेशन न घेतलेल्या कुटुंबाचाही शोध
सहा महिन्यांत एकदाही रेशन न घेतलेल्या कुटुंबांचा शोध घेतला जात आहे. अशांचा शोध घेऊन त्यांची कार्डे रद्द केली जात आहेत. वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारपेक्षा अधिक असलेल्या आणि सरकारी कर्मचारी असूनदेखील रेशनकार्ड मिळविलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मासिक रेशन न घेता केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी काहींनी बेकायदा बीपीएल कार्डे मिळविली आहेत, अशांना आता दणका बसणार आहे.
अपात्र लाभार्थ्यांची कार्डे रद्द
खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल कार्डे मिळविलेल्यांवर कारवाई केली जात आहे. शिवाय सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेल्यांवरही कारवाई होणार आहे. अपात्र लाभार्थ्यांची कार्डे रद्द केली जात आहे. मात्र पात्र लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही.
- मल्लिकार्जुन नायक (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)