जवानाच्या गोळीबारात दोन सहकाऱ्यांचा मृत्यू
जेवणात मिरची न दिल्याने गोळी झाडली
वृत्तसंस्था/ बलरामपूर
छत्तीसगडमध्ये बुधवारी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (सीएएफ) एका जवानाने जेवण करताना मिरची न दिल्याने आपल्याकडील सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. एका जवानाचा गोळी लागल्याने तर दुसऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. दरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाच्या दोन्ही पायात गोळ्या घुसल्याचे सांगण्यात आले. बलरामपूर जिह्यात बुधवारी एका सीएएफ सैनिकाने आपल्या सहकारी सैनिकांना जेवणाच्या वेळी मिरची न दिल्याने त्यांच्यावर सर्व्हिस रायफलने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमी झालेल्या दोघांना कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण सामरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भुताही कॅम्पमध्ये घडले आहे. सीएएफ 11व्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या अजय सिदार या जवानाने बुधवारी सकाळी 11.30 वाजता त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. गोळ्यांचा आवाज ऐकून जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अजयला पकडून नियंत्रणात आणले. त्याची अधिक चौकशी केली जात आहे.