Sangli: अतिवृष्टीची 150 कोटींची भरपाई मदत लालफितीत !
दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत येणार
सांगली : जिल्ह्यात जुलैमधील पूर आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळी पट्टयातील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, बाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, जत आणि पलूस तालुक्यांतील गावांतील संकटात सापडलेल्या सुमारे लाखांबर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १४९ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले मात्र, सोमवारी सायंकाळीही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. मंगळवारपासून बँकांना दीपावलीच्या सुट्ट्या असल्याने नुकसान भरपाई लालफितीत अडकली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली होती. सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरु केला होता.
कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला. पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यात दाणादाण झाली. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.
राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मदत जाहीर केली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील सुमारे ९४ लाख शेतकऱ्यांसाठी ७,३३७ कोटी ८९ लाखांची भरपाई मंजूर केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सध्या ही मदत प्रति हेक्टर या दराने, दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यासाठी १४९ कोटी ९५ लाख रुपयांची भरपाईची मदत मंजूर झाली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीची मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दिवाळीपूर्वी म्हणजे सोमवारी जमा होणे अपेक्षित होते, मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. आता बँकांना सुट्टया आहेत. त्यामुळे अतिवृष्टी भरपाईची मदत लालफितीत अडकली असून दिवाळीनंतरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.