ज्याच्याकडे 144 आमदार तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री...केसी राव यांना आम्ही घाबरलो होतो- हसन मुश्रीफ
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घातल्यावर आम्हीही घाबरलो होतो. असा खुलासा राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच ज्याच्याकडे 144 आमदार असतील तोच मुख्यमंत्री होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरात बोलताना हसन मुश्रीफ यांनी पाच राज्यांच्या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, "हा विजय महायुतीचा आहे. त्यामुळे येत्या काळातही महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार. के.सी. राव जेव्हा महाराष्ट्रात आपला ताफा घेऊन दाखल झाले त्यावेळी आम्हालाही वाटलं होतं की आता काय होणार ? गेल्या दहा वर्षात तेलंगणाची मोठी प्रगती झाली अशा जाहिराती पेपरला येत होत्या. पण ग्राऊंड लेवलची परिस्थिती वेगळी होती. राज्यात सर्व काही अलबेल असतं आणि दुसऱ्या राज्यात चाल करतोय असं असतं तर वेगळी गोष्ट होती." असे ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे जाहीर केले. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, "प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मात्र ज्याच्याकडे 144 आमदारांची संख्या आहे तोच मुख्यमंत्री होणार. मग तो शपथविधी वानखेडेला असो किंवाब्रेबाल स्टेडियमवर. त्यामुळे बावनकुळेंच्या विधानावरून महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही. सर्व काही निर्णय चर्चा होऊनच घेतल्या जातील." असे त्यांनी म्हटले आहे.