जिल्ह्यात तीन वर्षांत 1,036 नवजात शिशूंचा मृत्यू
राज्यात बेंगळूर आघाडीवर : सर्व सुविधा असूनही मृत्यूचा दर वाढताच
बेळगाव : गेल्या तीन वर्षांत राज्यभरात 18,931 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. एक वर्षाखालील बालकांचा अकाली मृत्यू होणे ही चिंतेची बाब बनली आहे. 2022-23 मध्ये 7431, 2023-24 मध्ये 5634 आणि 2024-25 मध्ये 5826 अशा एकूण 18,931 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बेंगळुरात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यानंतर म्हैसूर, रायचूर, बळ्ळारी आणि बेळगावचा क्रमांक लागतो.
आरोग्य व्यवस्थापन माहिती व्यवस्था (एचएमआयएस) सॉफ्टवेअरमध्ये नोंदविलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. तथापि, 2023-24 मध्ये त्यात थोडीशी घट झाली असली तरी 2024-25 मध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मॉडेल रजिस्ट्रेशन सिस्टम (एसआरएस) अहवालानुसार कर्नाटकातील बालमृत्यू दर प्रति एक हजार जिवंत जन्मामागे 12 पर्यंत कमी झाला आहे. देशातील ही सरासरी 26 इतकी आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये देशात सर्वाधिक बालमृत्यूदर आहे. तर केरळमध्ये मृत्यूदर प्रति एक हजार जिवंत जन्मामागे 5 इतका आहे.
सरकारकडून नवजात शिशूना चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवजात शिशू संगोपन आणि वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयांमध्ये विशेष नवजात शिशू युनिट्स (एसएनसीयू) आणि इतर आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. विशेषत: शिशू मृत्यू रोखण्यासाठी ज्या तालुक्यांमध्ये प्रसूतींची संख्या जास्त आहे. तशा निवडक रुग्णालयांमध्ये 50 एसएनसीयू स्थापन करण्यात आले आहेत. या युनिट्समध्ये 24 तास कर्मचारी कार्यरत आहेत.
बालरोगतज्ञ, डॉक्टर, परिचारिकांसह साहाय्यक कर्मचारी आहेत. काही कमी वजनाच्या नवजात बालकांसाठी व्हेंटीलेटर सपोर्टसाठी आधुनिक श्वसन प्रणाली आहेत. एसएनसीयूमध्ये कांगारू मदर केअर (केएमसी) वाढ सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यात 165 एनबीएसयू कार्यरत आहेत. प्रसूती करणारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तरीय रुग्णालये आणि जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये 1,084 नवजात शिशू काळजी केंद्रे (एनबीसीसी) कार्यरत आहेत. तुमकूरमधील शिरा, मंड्यामधील केआरपेठ, हसनमधील होळेनरसिपूर, उडुपी येथील कुंदापूर, बेळगाव येथील गोकाक, कलबुर्गी येथील जेवर्गी, बिदर येथील हुमनाबाद, कोप्पळ येथील गंगावती तालुका हॉस्पिटलमध्ये विशेष नवजात शिशू युनिट्स सुरू केले आहेत. या सर्व सुविधा असूनही अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत्यूची कारणे काय?
अकाली जन्म, कमी वजनामुळे होणारा त्रास, जन्मावेळी गुदमरणे, न्युमोनिया, सेप्सिस, जन्मजात हृदय समस्या, न्युरोलॉजिकल डिसऑर्डर.