स्वरयोगीनी
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, संगीत रचनाकार, लेखिका व प्राध्यापिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने एका स्वरयोगिनीलाच देश मुकला आहे. या स्वरप्रभेच्या सृजनशील कारकीर्दीचा धांडोळा घेतला, तर अभिजात शास्त्रीय संगीताचा ध्यासच त्यातून अधारेखित होताना दिसतो. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्या संगीत, भजन व भावसंगीत गायकीवर आपला अमीट ठसा उमटविणाऱ्या प्रभाताईंनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची जपणूक केली. किराणा घराण्यातील महान गायक पं. सुरेशबाबू माने आणि त्यांच्या भगिनी पद्भभूषण हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या म्हणून त्या परिचित असल्या, तरी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी पेले. वयाच्या आठव्या वषी एक चिमुरडी शास्त्रीय गायनाकडे वळते, हिराबाईंकडे संगीताचे धडे गिरवू लागते, त्यांना साथसंगत करते नि बघता बघता तिची स्वरप्रतिभा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचते, हे सारेच अचंबित करणारे होय. फर्ग्युसनमधील विज्ञान व विधी महाविद्यालयातील कायद्याची पदवी अशी सगळी पार्श्वभूमीवर असताना त्यांचा जीव रमला तो संगीतात, ही त्याहून निराळी गोष्ट. त्यामुळेच संगीत विषयात त्या केवळ डॉक्टरेट मिळवून थांबल्या नाहीत, तर शास्त्रीय संगीतातील जवळपास सगळ्या प्रकारांना त्यांनी आपल्या प्रतिभेचा परिसस्पर्श घडविला. विशेष म्हणजे नियमांची चौकट आणि स्वातंत्र्य याचा त्यांनी जुळवलेला सांधा. त्यांची राग आळवण्याची पद्धत आगळी असे. तो गाताना त्यांनी ना नियमांची चौकट मोडली, ना अनाठायी स्वातंत्र्य घेतले. मात्र, रागाचे भावलेले स्वरूप त्यांच्या गाण्यातून प्रतिबिंबित होत असे. बदल हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे, असे आपण म्हणतो. कालानुऊप अनेक गोष्टी बदलत असतात. शास्त्रीय संगीतातही त्यादृष्टीने बदल अपरिहार्य ठरतो. रागाचा मूळ प्राण तसाच ठेवत प्रभा अत्रे यांची गायकी अशा बदलाचे दर्शन घडवते. नवीन राग निर्माण करणे फारसे अवघड नाही. पण, त्यात नावीन्य ओतणे कठीण आहे, अशी त्यांची भूमिका होती. त्याच्या भूमिकेतून त्यांनी रागाला नवे ऊप दिले. तसा प्रत्येक गायकावर कुणाचा ना कुणाचा प्रभाव असतो. प्रभाताईंच्या गाण्यावर उस्ताद अमीर खाँ आणि उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या गायनाचा प्रभाव दिसे. तथापि, त्यांची म्हणून एक ‘प्रभा’वी शैली होती. ही शैली, कलेप्रतिची असाधारण निष्ठा, बदलत्या काळाची जाणीव यास त्यांचा सौंदर्यवादी दृष्टीकोन, भावपूर्ण आविष्कार आणि लालित्यमय प्रस्तुतीकरण याचे जोड मिळत असे. नव्हे, ते त्यांचे वैशिष्ट्याच होते. त्यामुळेच शास्त्रीय संगीत त्या सर्वसामान्य रसिकापर्यंत सहजरीत्या पोहोचवू शकल्या. पारंपरिक रचनांना गायन साज चढविणाऱ्या या महान विदुषीने भारतीय संगीत क्षेत्रात नवतम रचनांचीही भर घातली. काळाच्या गरजेनुसार त्या त्या पिढीने नवीन बंदिशींची भर घातली आहे. आज माझ्या शैलीला साजेशी बंदिश असणे, हे मला माझ्या कलाविष्कारासाठी महत्त्वाचे वाटते. म्हणूनही मी बंदिश बांधण्यास प्रारंभ केला, असे डॉ. प्रभाताई सांगतात. या बंदिशीतील नवे पैलू, वैविध्य, जिवंतपणा यातून रसिकांना त्यांचे वेगळेपण लक्षात येते. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या सवाई गंधर्व महोत्सवाचा समारोप डॉ. प्रभा अत्रे यांच्या भैरवीने होत असे. पंडितजींनीही प्रभाताईंच्या स्वरसामर्थ्याचा अतिशय सुंदर शब्दांत गौरव केला आहे. संगीतशास्त्र आणि सौंदर्यशास्त्राचा मिलाफ हे त्यांच्या बंदिशीचे वैशिष्ट्या. त्यांची सहजसुंदर बंदिश मर्मज्ञांबरोबर सर्वसामान्य श्रोतृवर्गासह मोहीत करते, असे पंडितजी म्हणत. खरेतर त्या किराणा घराण्यातल्या. तसा तेथील रागसंच मर्यादित व विविधतेचा अभाव असलेला. तरीही प्रभाताई घराण्यापलीकडे जाऊन नवनवीन राग व ताल समर्थपणे हाताळत, ही त्यांच्या संगीताची ताकद होय. त्यांनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप-मल्हार, तिलंग-भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची केलेली निर्मिती ही भारतीय शास्त्रीय संगीतास मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’ या तर अजरामरच रचना म्हणता येतील. शास्त्रीय संगीताची मैफल जागवत ठेवणाऱ्या या विदुषीने केलेली लेखनसेवाही अतुलनीय अशीच. ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, स्वरांगिणी, स्वररंजनी यांसारख्या पुस्तकातून त्यांनी केलेली संगीतविषयक मांडणी महत्त्वाची होय. याशिवाय ‘सरगम : एक सशक्त संगीत सामग्री’ हा शोधग्रंथही सखोलतेचा ध्यास घेण्याच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्याचा परिपाक होय. गायिका, रचनाकार, लेखिका अशा त्रिविध भूमिका बजावणाऱ्या प्रभाताईंनी तऊण वयात काही संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिकाही केल्या, तसेच अध्यापन क्षेत्रातही आपले योगदान दिले. ‘डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन’ व ‘स्वरमयी गुऊकुल’ माध्यमातून गानसंस्कार व शास्त्रीय संगीतसेवेतही त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. शास्त्रीय संगीताच्या मैफलींद्वारे भारतीय कंठ्या संगीत खऱ्या अर्थाने विदेशात पोहोचविणाऱ्या गायक कलाकार म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. तो सार्थच. उस्ताद राशीद खाँ यांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप संगीत क्षेत्र सावरले नसतानाच अकस्मातपणे प्रभाताईंच्या निधनाची बातमी कानी यावी, हे अतिशय धक्कादायक होय. अर्थात त्या हयात नसल्या, तरी त्यांचे गाणे आयुष्यभर प्रत्येक गानप्रेमीची सोबत करेल. त्यांचे आलापी प्रधान, सर्वांगसुंदर, प्रगल्भ गाणे अजरामरच असेल. यात कोणताही संदेह नाही. या महान स्वरयोगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली!