विजयाच्या गुढीसाठी सज्ज पण मित्रपक्षांची अढी ...
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा तसेच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांसाठी तसेच नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा तिसरा टप्पा मानला जात आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या जागांसाठी भाजपने सातारा वगळता इतर ठिकाणीच उमेदवार घोषित केले आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर तिसऱ्या टप्प्यातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांच्या अढीमुळे ही गुढी उभारण्याची संधी कोण साधतो हे पाहावे लागणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. खासदार हेमंत गोडसे नाशिकमधून, खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून, नारायण राणे आणि किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधुन, सांगलीतून विशाल पाटील लोकसभा निवडणुकीत विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र मित्रपक्षांची अढी असल्याने ही गुढी उभारण्याची संधी कोणाला मिळणार हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. महायुती कामाला लागली आहे. मात्र पक्षाकडून अद्याप उमेदवारीची घोषणा करण्यात न आल्याने या जागांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील लढतींचे चित्र जरी स्पष्ट झाले असले, तरी राज्यातील महायुतीत आणि महाआघाडी दोन्हीसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या जागांसाठीचे उमेदवार मराठी नवीन वर्षाच्या सुरूवातीला ठरण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामती, माढा, सातारा, धाराशीव, लातुर, सोलापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, हातकणंगले व सांगली या महत्त्वाच्या 11 जागांचा समावेश आहे. माढा येथे महाआघाडीचा तर सातारा येथील जागेसाठी दोघांचा उमेदवार घोषित होणे बाकी आहे. तिसऱ्या टप्प्यातील सांगलीतील उमेदवारीचा तिढा वाढत असताना आता सांगलीनंतर भिवंडीतही काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीने विश्वासात न घेता भिवंडीत बाळ्या मामाची उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसने करताना राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये नेमका कुणाला जाणार? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगलीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम व विशाल पाटील यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून त्यात अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सांगलीत जर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला तर याचे पडसाद इतर मतदार संघातही उमटण्याची शक्यता आहे.
महायुतीतील भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप विरोधात नरमाईचे धोरण घेतल्याचे बघायला मिळत असून, शिंदेपेंक्षा अजित पवार हे जागा वाटपात हावी ठरल्याचे पहायला मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसाठी भाजपने दावा केला असून नारायण राणे यांनी तर थेट शिंदेंच्या शिवसेनेचे कोकणात अस्तित्व काय? असा सवाल पत्रकार परिषदेत केला. रायगडची जागा महायुतीत सुनिल तटकरे लढणार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजप लढणार मग शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना याचे काय? या मुद्याचा आता ठाकरेंच्या शिवसेनेने प्रचार करायला सुरूवात केली आहे.
भाजपने शिवसेनेने दिलेला उमेदवार बदलला पण त्यांनी दिलेले एक ही उमेदवार बदलले नाही. आत्तापर्यंत भाजपने विद्यमान खासदार असलेल्या 23 पैकी 22 उमेदवारांची घोषणा केली असून केवळ मुंबईतील उत्तर मध्य या पुनम महाजन खासदार असलेल्या जागेची घोषणा करण्याचे बाकी ठेवले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना एका रात्रीत भाजपमध्ये घेऊन प्रवेश दिला, म्हणजेच भाजपने 23 उमेदवारांची घोषणा केली आहे.
उध्दव ठाकरेंसोबत असलेल्या 5 खासदारांविरोधात शिंदेंचा उमेदवार नाही
उध्दव ठाकरेंसोबत असलेल्या 5 विद्यमान खासदारांपैकी परभणीची जागा राष्ट्रवादी अजित पवारने महादेव जानकर यांना, तर धाराशीवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना सोडली तर इतर ठाणे, दक्षिण मुंबई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर भाजप दावा करत आहे. उध्दव ठाकरेंसोबत राहिलेल्या खासदारांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिल्यास तेथे गद्दार विरूध्द खुद्दार असा सामना होऊ शकतो. त्यामुळे या पाच ठिकाणी बहुदा भाजप रिस्क घेण्याचे टाळत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. उरलेल्या ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या जागांवर एक तर भाजप किंवा शिवसेनेतून भाजपात घेऊन कमळ या चिन्हावर लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपली शिवतिर्थ येथे सभा घेऊन भूमिका मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मनसेने या दोन टप्प्यात कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मनसेने भाजपकडे ज्या दोन जागांची मागणी केल्याची चर्चा होती, त्यातील शिर्डी या राखीव असलेल्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे, तर दक्षिण मुंबईची महायुतीने जागा अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे ही निवडणूक लढणार की स्किप करणार की भाजपसोबत जाणार? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी 2009 लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन मुंबई, ठाण्यात शिवसेना-भाजप युतीचा सुपडासाफ केला होता, त्यावेळी ‘एक ही मारा लेकीन सॉलिड मारा’ बोलणारे राज ठाकरे आज कोणती सॉलिड भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे