महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’... परामर्श (43)
वाचकहो, जगप्रसिद्ध शाकुंतल नाटकाची कथा आपण इतके दिवस वाचत होतो. हे नाटक इतके लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे त्यांची लेखनाची भट्टी सर्वार्थाने जमली आहे. हे नाटक म्हणजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या विरोधाचा आणि संयोगाचा काव्यमय इतिहास आहे. संयोगाचेही दोन विभाग आहेत. शकुंतला आश्रमकन्या आहे, तर दुष्यंत नगरवासी राजा! दोन नाटय़स्थलांपैकी एक आश्रमाची प्रशांत वातावरणाची पृ÷भूमी असलेल्या आणि तिथे कण्वांसारख्या कुलपतीच्या पितृतुल्य छत्रछायेखाली नांदणाऱया कुटुंबाच्या आयुष्यातील घरोघरी घडणारा अत्यंत ह्रदयस्पर्शी प्रसंग म्हणजे मुलींची तिच्या हक्काच्या घरी केली जाणारी पाठवणी! पहिल्या चार अंकात तपोवन, आश्रम, शांती, साधेपणा, निरागसता दिसते. तर पाचव्या अंकापासून लोकांनी गजबजलेले नगर, दरबार, कावेबाजी, दुःख, निराशा, क्षोभ इ.भावभावना दिसतात. सहाव्या अंकात कोळय़ाला पकडून आणणे, नाममुद्रिका सापडणे इ.मुळे निर्माण होणाऱया पश्चात्ताप, औदासिन्य, विरहवेदना इ.भावना दिसतात. शेवटच्या सातव्या अंकात तपोमय, समतामय, निष्काम असे विशुद्ध वातावरण आणि तिथे प्रत्यक्ष देवदानवांचे मातापितर आदिती आणि मारीचऋषी यांच्या मंगल शुभाशीर्वादामुळे दुष्यंत आणि शकुंतला यांचे मीलन, त्यांचा पुत्र भरताला मिळालेला सम्राट होण्याचा आशीर्वाद, प्रत्यक्ष महेंद्राची भेट आणि राजा व महेंद्राने एकमेकांना नेहमी सहाय्य करण्याचे दिलेले वचन अशा अनेक सुखमय गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या ह्रदयालाही थंडावा मिळतो. नाटकाचे कथानक अनेक वळणे घेत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावते, उत्कंठा वाढवते, कधी डोळय़ांत पाणीही आणते.. पण शेवटी नायक नायिकेचे मीलन होत असल्याने नाटक पाहून लोकही सुखाने घरी जात असणार!
एखाद्या नाटकाची लोकप्रियता ही त्यात सांगितलेल्या एखाद्या सिद्धांतावर आणि तत्त्वे यांच्या उच्चतेवर अवलंबून असते. पण इतरही अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. नाटककार हा त्यातील पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या भावभावना, त्यांचा हलकेपणा, मोठेपणा, त्यांचा आस्तिक-नास्तिकपणा, अवनती, उन्नती, पश्चात्ताप इत्यादी गोष्टी त्याच्या अनुभवानुसार त्यात रेखाटत असतो. त्याच्या स्वतःच्या भावना, अनुभव यांचेही त्यात मिश्रण असते. एकप्रकारे लोकांच्या संसाराचे चित्र तो रेखाटत असतो. ते जर प्रेक्षकांच्या ह्रदयाला भिडले, तर ते नाटक लोकप्रिय होते. अन्यथा नाटककार आणि प्रेक्षक यांच्या ध्येय, कल्पना, अपेक्षा यांच्यात जर विरोध निर्माण झाला तर ते लोकप्रिय होत नाही. पण त्यांच्याच संसाराची प्रतिकृती त्यांच्यासमोर आली, तर ते त्याच्याशी तादात्म्य पावतात, तेव्हाच ते लोकप्रिय होते.