भारताचा अवकाश कार्यक्रम प्रगतीपथावर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा अवकाश कार्यक्रम त्याच्या पूर्वनिर्धारित पद्धतीने प्रगतीपथावर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने 2035 पर्यंत अवकाशात अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना निर्धारित केली असून 2040 पर्यंत प्रथम भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरविला जाण्याची योजना आहे. या दोन्ही योजनांवर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार काम केले जात असून हे दोन्ही प्रकल्प पूर्व नियोजित वेळेत पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन इस्रोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच अवकाशात अंतराळ स्थानके प्रस्थापित केली आहेत. भारताची योजना यशस्वी झाली तर भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. इस्रोला ही योजना यशस्वी होण्याचा विश्वास असून त्यासाठी पूर्ण जोमाने काम केले जात आहे. या प्रकल्पाच्या आधीही अनेक प्रकल्प असून तेही यशस्वी करुन दाखविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. चंद्रावर मानव उतरविण्याची योजनाही योग्य प्रकारे आकाराला येत आहे. भारताने आतापर्यंत अनेक अवघड अवकाश प्रकल्प सुलभतेने पार केल्यामुळे हे दोन प्रकल्पही व्यवस्थित पार केले जातील. इस्रोचे संशोधक यासाठी समयबद्ध पद्धतीने कार्यरत आहेत, अशीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चांद्रयान अभियान यशस्वी
चांद्रयान-3 हे अभियान इस्रोने उत्तम रितीने यशस्वी करुन दाखविले आहे. त्यामुळे संशोधकांचा आत्मविश्वास वाढला असून ते याहीपेक्षा जटील अभियाने हाती घेण्यासाठी अतियश उत्सुक आहेत. भारतनिर्मित तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करुन ही अभियाने पूर्ण करु, असेही प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले आहे.