कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रतिज्ञा प्रशासनाची सोय नागरिकांची...?

10:31 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वप्नी वसेल...ते कृतीत दिसेल?

Advertisement

-मनीषा सुभेदार

Advertisement

ऐकलतं का तुम्ही?

काय ऐकलं?

तुम्हाला कळले नाही का?

अहो पण काय?

बेळगावमध्ये प्रथमच चोरांची बैठक

बेळगावमध्ये प्रथमच चोरांनी एक बैठक घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. काय सांगता काय? कारण काय? कारण फार महत्त्वाचे आहे? तुमच्या लक्षात आले आहे का? सध्या बेळगावमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. अपघात, खून, मारामारी, अन्य दुर्घटना वाढतच चालल्या आहेत. या सर्वांना सामोरे जाताना चोऱ्या आणि गुन्हेगारीमुळे पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. त्यांनी लक्ष तरी कुठे कुठे द्यावे? लोकसंख्या वाढत चालली आहे. आणि पोलिसांची संख्या कमी आहे. शिवाय सर्व आंदोलने, बंदोबस्त, मिरवणुका यामुळे त्यांना स्वत:कडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ राहिला नाही.

या पार्श्वभूमीवर आता चोरांनीच एक बैठक घेऊन पोलिसांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या बैठकीत पोलीससुद्धा माणूस आहे. यावर चोरांचे कधी नव्हे ते एकमत झाले. आणि आता पोलिसांवर अधिक ताण पडू नये म्हणून त्यांनी काही महिने चोरी करणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चोरांची ही भूमिका कर्णोपकर्णी पोलिसांपर्यंत पोहचलीच आणि त्यांनी चोरांना मनापासून धन्यवाद दिले आहे. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असणाऱ्या पोलिसांना चोरांच्या या सहकार्यामुळे भरून आले आहे.

तानाजी रेल्वे गेट पुन्हा सुरू करण्याचा विचार

शहरात सध्या सर्वत्र उड्डाण पुलांची चर्चा सुरू आहे. तानाजी रेल्वे गेट बंद झाल्याने नागरिकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन हे रेल्वेगेट पुन्हा सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. आमच्या अत्यंत विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती आली आहे. रेल्वेने नागरिकांच्या गैरसोयीची अशी दखल घेणे स्वागतार्हच आहे. परंतु रेल्वे प्रवासातही गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया उमटली.

सर्व महत्त्वाच्या शहरांना सांबरा विमानतळावरून विमानसेवा

बेळगाव हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. पश्चिम महाराष्ट्र व गोवा यांना जोडणारे हे शहर शैक्षणिक आणि वैद्यकीय हब म्हणून नावारुपास येत आहे. याचा विचार करून आता विमान प्राधिकार मंडळाने आणि हवाई दलाने देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना बेळगावच्या सांबरा विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सुटणार

शहरातील वाहतूक कोंडीने उग्रस्वरुप धारण केल्याने नागरिकांनीच कृतीशील पाऊल उचलले आहे. जेथे वाहने पार्क करण्यास जागा नाही तेथील नागरिकांनी आपापल्या बंगल्याची किंवा घराची जागा वाहने पार्क करण्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ‘हुश्श’ केले आहे. बेळगावचा हा आदर्श इतर शहरांनीही घेण्यासारखा आहे. याचबरोबर बसथांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना आपल्या वाहनातून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कार पूलचा हा प्रयोग यशस्वी झाला तर मोठीच सोय होणार आहे.

नागरिकांचा विकास हाच आमचा ध्यास

महानगरपालिका म्हणजे बेळगावकरांचे प्रतिनिधित्व करणारी स्वराज्य संस्था. बेळगावच्या विकासाच्या अनेक चर्चा येथेच होतात. त्यामुळे ‘नागरिकांचा विकास हाच आमचा ध्यास’ असे म्हणत आता सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकत्र येऊन समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही भेदभाव (पक्षीय) न करता आता बेळगावकरांचे कल्याण याच विचाराने ते झपाटून गेले आहे.

सर्व ठिकाणचे टोल माफ

विमानसेवा सुरू झाल्यास त्याचा आनंद यासाठीही टोल भरावा लागणार नाही. परंतु आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे आता कोणत्याच टोल नाक्यावर टोल भरावा लागणार नाही. महामार्ग प्राधिकरण मंडळाने वाहनचालकांच्या खिशाचा विचार करून सर्व ठिकाणचे टोल माफ केले आहे. ही वार्ता ऐकून आश्चर्याने कोणी मुर्च्छीत झाले तर आम्ही जबाबदार नाही.

एलअँडटीकडून घरोघरी टँकरने पाणीपुरवठा

सध्या उन्हाच्या झळा तीव्र असून पाणीटंचाई सुरू झाली आहे. घागरीच्या लांबलचक रांगा, पाण्यासाठी घागरी घेऊन मैलोनमैल चालणाऱ्या महिलांचा एलअँडटीने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. त्यामुळे आता दररोज सकाळी एलअँडटीचे टँकर प्रत्येक गल्लीत जाऊन घरोघरी टँकरने पाणीपुरवठा करणार आहेत. इतकेच नव्हे तर यापुढे शहरात एका ठिकाणी सुद्धा जलवाहिनीला गळती दिसू देणार नाही, अशी प्रतिज्ञा एलअँडटीने केली आहे.

हेस्कॉमकडून वीज दरवाढ मागे !

वीजदरवाढीचा शॉक अशी बातमी आपण नुकतीच वाचली. मात्र आता हेस्कॉमने नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांना दिलासा देत ही दरवाढ मागे घेण्याचे ठरविले आहे. पाणीटंचाईमुळे कदाचित वीज टंचाईचे संकट उद्भवू शकते. परंतु हे संकट ही संधी मानून कोणत्याही परिस्थितीत वीज दरवाढ करणार नाही हा निर्णय ऐन उन्हाच्या झळांमध्ये नागरिकांच्या मनावर फुंकर घालणाराच ठरणार आहे.

मोफत आरोग्य सेवा

वैद्यकीय क्षेत्राने तर फारच महत्त्वाचा आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. बेळगावमधील बहुसंख्य डॉक्टरांनी आता प्रत्येक रविवारी ठिकठिकाणी व प्रामुख्याने वंचित घटकांच्या वसाहतीत जाऊन मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बेळगावकरांचे आणि शहराचे आरोग्य निकोप राहणार आहे.

कॉलेज रोडवर लवकरच लहानसा ‘पूल’

कॉलेज रोडवर घातलेल्या दुभाजकांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एका बाजूच्या रस्त्यावरून दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर येण्यासाठी वाहन चालकांना लांब लचक वळसा घालावा लागतो आहे. यामध्ये पेट्रोल, श्रम, आणि वेळ खर्ची पडत असल्याचा विचार करून या दोन्ही रस्त्यांना जोडणारा एक लहानसा ‘पूल’ लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाची नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.

बसमध्ये पंखे अन् एअरकुलर

शक्ती योजनेमुळे परिवहनच्या बसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. खर तर योजना आमच्यासाठी करा, अशी मागणी पुरुष वर्गही करू लागला आहे. सध्या या मागणीचा विचार परिवहन खात्याने केला नसला तरी आता सर्व स्थानिक पातळीवर धावणाऱ्या बसमध्ये पंखे आणि एअरकुलर बसविण्याचा विचार परिवहन खाते करत आहेत. त्याचबरोबर बसथांब्यावरही ही सोय करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे.

प्रशासन आंदोलकांची काळजी घेणार

आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणे, हा तर नागरिकांचा अधिकार. परंतु म्हणून काय त्यांनी उन्हातान्हात तापत रहायचे? नाही, प्रशासनाला आंदोलकांचे हाल पहावत नाही. त्यामुळे आता चन्नम्मा चौकामध्ये आंदोलकांसाठी खास मंडप उभारण्यात येणार आहे. तसेच चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कापडाचे मोठे आच्छादन आणि दोन्ही बाजुला पंखे बसवून प्रशासन आंदोलकांची काळजी घेणार आहे.

मॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी आसन व्यवस्था

शहराचा विकास झपाट्याने होत असून आता सर्वत्र मॉल उभे आहेत. या प्रत्येक मॉलमध्ये दररोज आणि शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी असते. येणाऱ्या ग्राहकांचा विचार करून मॉल चालकांनी आता तेथे ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी आसन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरेदी करताना अधे मधे आडवे तिडवे धावणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या पालकांनाही दिलासा मिळणार आहे.

‘मॉर्निंग वॉक’चा महत्त्वपूर्ण संकल्प

शहरातील डॉक्टर व आहार तज्ञ यांच्यामध्ये बेळगावमध्ये स्थूलत्त्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. डॉक्टर प्रत्येकांना व्यायाम आणि योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यामुळे आजपासून तमाम बेळगावकरांनी (रुग्ण, दिव्यांग वगळता) ‘मॉर्निंग वॉक’ जाण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. आता सकाळी 10 च्या दरम्यान दिसणारी गर्दी पहाटेपासूनच दिसणार आहे.

आज एक एप्रिल म्हणजे एप्रिल फूल करण्याचा दिवस. आपल्या शहराची स्थिती पाहता दिली गेलेली आश्वासने आणि त्याचा फोलपणा लक्षात घेता आपला दररोजच एप्रिल फूल होत असतो त्याचीच ही झलक. (एप्रिल फूल)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article