For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नामिबियामध्येही मोदींचा ‘सर्वोच्च’ पुरस्काराने गौरव

06:58 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
नामिबियामध्येही मोदींचा ‘सर्वोच्च’ पुरस्काराने गौरव
Advertisement

स्वागतावेळी 21 तोफांची सलामी : विमानतळावर कलाकारांसमवेत ढोलवादन : 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची नामिबियाला भेट

Advertisement

वृत्तसंस्था / विंडहोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या पाच देशांच्या विदेश दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाची राजधानी विंडहोक येथे पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ देऊन सन्मानित करण्यात आले. नामिबियाच्या ‘सर्वोच्च’ सन्मानापूर्वी पंतप्रधान मोदींना विंडहोकमध्ये 21 तोफांची सलामी देण्यात आली. गेल्या तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा नामिबियाचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. नामिबियामध्ये पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी नामिबियाच्या स्थानिक कलाकारांसह ढोल वाजवले.

Advertisement

1990 मध्ये नामिबियाच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच 1995 मध्ये विशिष्ट सेवा आणि नेतृत्वाची ओळख पटविण्यासाठी हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला होता. नामिबियामध्ये आढळणाया वेल्विट्सचिया मिराबिलिस या अद्वितीय आणि प्राचीन वाळवंट वनस्पतीच्या नावावरून या पुरस्काराचे नाव निश्चित झाले असून नामिबियाच्या लोकांच्या लवचिकता, दीर्घायुष्य आणि चिरस्थायी आत्म्याचे प्रतीक मानला जातो. विदेशात पंतप्रधान मोदींना प्राप्त झालेला हा 27 वा पुरस्कार आहे. मंगळवारीच ब्राझिलिया येथेही पंतप्रधानांना सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामिबिया दौरा भारत आणि नामिबियामधील धोरणात्मक भागीदारीला नवीन उंची देण्याच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या नामिबियाच्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान अधिकृत कार्यक्रमांच्या सुरुवातीला भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती नेतुम्बो नंदी-नदाईतवा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा नामिबियाचा पहिलाच दौरा आहे.`

द्विपक्षीय चर्चा आणि करार

पंतप्रधान मोदी आणि नामिबियाच्या राष्ट्रपती नेतुम्बो नंदी-नदाईतवा यांच्यात द्विपक्षीय चर्चाही झाली. या चर्चेत जागतिक दक्षिणेतील व्यापार, संरक्षण, डिजिटल सहकार्य आणि भागीदारी यासारख्या मुद्यांवर सखोल चर्चा समाविष्ट आहे. भारत आणि नामिबियामध्ये व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, आयसीटी आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात एकूण सहा महत्त्वाचे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले. तसेच यूपीआयसह खनिज आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरील करारांचाही समावेश आहे. तसेच, युरेनियम, कोबाल्ट आणि लॅन्थानाइड्स सारख्या महत्त्वाच्या खनिजांवर दीर्घकालीन करारावरही चर्चा झाली.

Advertisement
Tags :

.