जागतिक स्तरावर भारतीय संविधानाला महत्त्व : राज्यपाल
गोवा विद्यापीठाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिन, अधिकाऱ्यांना पदके प्रदान
प्रतिनिधी/; पणजी
भारत देशाला 1950 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेले भारतीय संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीप्राप्त प्रजेचे राज्य अस्तित्वात आले. भारतीय संविधान हे गौरवाप्रत असून, जगातील सर्व राष्ट्रांत भारतीय संविधानाला प्रथम मान्यता दिली जाते. संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच देशाचा कारभार चालत आला आहे, हे भारत देशाचे खास वैशिष्ट्या आहे, अशा शब्दांत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भारतीय संविधानाबद्दल गौरवोद्गार काढले.
गोवा विद्यापीठाच्या मैदानावर 75 व्या प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई यांनी जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, विविध खात्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, लष्कर, नौसेना व नौदल या भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल पिल्लई म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची वाटचाल सुरू आहे. 2047 सालापर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या उद्दिष्ट्याची स्वप्नपूर्ती निश्चितच होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहेत. त्यापैकीच मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याशिवाय गोव्यात यशस्वीरित्या जी-20 परिषद झाली. त्यामुळे गोव्याचा नावलौकीक राष्ट्रीय पातळीवर झाला. राज्यात प्रथमच खेळाडूंसाठी मार्गदर्शक असा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उपक्रम, दिव्यांगबांधवांसाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्त यशस्वीरित्या पार पडला. याशिवाय गोवा राज्यात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे होत असल्याने गोवा हे देशाच्या नकाशात नक्कीच स्मार्ट राज्य झालेले पहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय नौसेना, गोवा राज्य पोलीस पथक, गोवा राज्य अग्निशामक दल, गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे जवान, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पथकांनी संचालन केले.
चौकट करा....
देशाच्या एकात्मतेला प्रथम महत्त्व द्या
भारत देश हा अनेक जाती, धर्म व पंथांनी समृद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणाबद्दलही आकस न ठेवता, कोणाचाही द्वेष न करता गुण्या गोविंदाने एकनिष्ठ राहून भारत देशाच्या एकात्मतेला महत्त्व द्यावे, असे आवाहनही राज्यपाल पिल्लई यांनी केले.
चौकट करा...
राज्यातील विविध अधिकाऱ्यांचा सन्मान
प्रजासत्ताकदिन, संविधानदिनानिमित्त राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर यांचा विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय आयपीएस अधिकारी ओमवीर सिंग, पोलीस अधिकारी निधीन वाल्सन, गोवा सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अंकिता मिश्रा, माहिती खात्याचे सचिव सुभाषचंद्र, आएएस अधिकारी संजित रॉड्रिग्ज, अजित रॉय, गोवा वीज खात्याचे वीज अभियंता अऊण पाटील, स्वेतिका सचन, अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर, अभिषेक धनिकाय, शिवेंदू भूषण, आयएफएस सौरभ कुमार, जॅबेस्टीन ए. यांनाही राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.