अधिक जागा जिंकल्यास सिद्धरामय्या पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री
यतिंद्र सिद्धरामय्या यांचे वक्तव्य : राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासन येथील एका कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत सिद्धरामय्या यांना पाठिंबा देऊन त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी द्या, असे आवाहन माजी आमदार यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यास सिद्धरामय्या हेच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी राहतील, असे यतिंद्र सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. याविषयी काँग्रेस नेत्यांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभेची निवडणूक लढविण्यात येईल. पक्षाला अधिक जागा जिंकल्यास कोणत्याही अडथळ्याशिवाय ते पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर राहतील, असे विधान मुख्यमंत्र्यांचे पुत्र यतिंद्र यांनी केले आहे. हासन जिल्ह्याच्या होळेनरसीपूर तालुक्यातील अण्णेचाकनहळ्ळी येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात यतिंद्र सिद्धरामय्या यांनी हे विधान केले आहे. गरीब, शोषित वर्गाच्या कल्याणासाठी काम करण्याची काँग्रेसला इच्छा आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांना तुम्ही पाठिंबा द्यावा. भविष्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. अधिक जागा मिळाल्यास आम्हाला आणखी बळकटी प्राप्त होईल. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी हे दाखवून द्यावे. तेव्हा सिद्धरामय्या यांचे पाठबळ वाढेल आणि आगामी काळातही गॅरंटी योजना जारी राहतील, असे यतिंद्र यांनी म्हटले आहे.
हायकमांडकडून नुकतीच भूमिका स्पष्ट : सतीश जारकीहोळी
लोकसभा निवडणुकीत पक्षाला अधिक जागा मिळाल्यास सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदावर राहतील, असे सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नकार दिला. काहीजण स्वत:चे वैयक्तिक मत व्यक्त करतात, त्यावर उत्तर देण्याची गरज नाही. मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाविषयी हायकमांडने आपली भूमिका नुकतीच स्पष्ट केली आहे. असे असूनही काहीजण वैयक्तिक मत मांडत आहेत. ही वक्तव्ये पक्षाशी संबंधित नाहीत. दिल्लीत अधिकार वाटपाविषयी कोणत्या चर्चा झाल्या, निर्णय झाले, याविषयी आम्हाला ठाऊक नाही, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
निर्णय हायकमांडवर अवलंबून : डॉ. परमेश्वर
मुख्यमंत्री बदलावा की नाही, हा निर्णय हायकमांडवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. लोकसभा निवडणूक प्रचारात केवळ सिद्धरामय्याच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदारही आहेत. सर्वजण मिळून 28 लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करणार आहे. आम्हाला अधिक जागा मिळण्याचा विश्वास आहे. सिद्धरामय्या यांना यापुढेही मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवावी की नाही, हे हायकमांड ठरवेल. याविषयी आम्ही प्रतिक्रिया देणे उचित नाही, असेही डॉ. परमेश्वर म्हणाले.
सिद्धरामय्यांच्या नेतृत्त्वाखालीच लोकसभा निवडणूक!
यतिंद्र हे जबाबदारी असणारे नेते आहेत. आपल्याला पाठबळ देण्यासाठी जनतेला आवाहन करणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्याची आवश्यकता नाही. आपले सरकार पाच वर्षे सक्षम राहील. सिद्धरामय्या हेच आमचे आता मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री म्हणून तर मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून एकत्रितपणे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली लोकसभेची निवडणूक होईल, यात शंका नाही.
- डी. के. शिवकुमार,
उपमुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष