अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणार उमेदवारांची लगीनघाई !
मुहूर्त टळला तर हुकणार संधी ; जि. प आणि पंचायत समिती निवडणूक
सावंतवाडी । प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार 21 जानेवारी आहे. या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची आणि अपक्षांची लगीनघाई होणार आहे. उमेदवारी अर्ज बुधवारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आह. तीन वाजण्याचा मुहूर्त टळला तर उमेदवारांची निवडणूक लढवण्याची संधी हुकणार आहे .त्यामुळे सर्वच उमेदवारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सावंतवाडीत जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या 18 जागा आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५ जणांनी तर पंचायत समितीसाठी 10 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सावंतवाडी तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची कसोटी पणाला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले. उमेदवारांनी सध्या तीन वाजेपर्यंत असेल त्या स्थितीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे उद्या उमेदवारांना मुहूर्तावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.