विद्यार्थिनीला शून्य गुण, शाळेला दंड
वृत्तसंस्था /चंदीगढ
हरियाणातील गुरुग्राम येथील शाळेतील एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चुकीने शून्य गुण देण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणात शाळेची चूक आहे, हे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने शाळेलाच 30,000 रुपयांचा दंड या अक्षम्य चुकीसंबंधात ठोठावला आहे. या शाळेत एकाच नावाच्या दोन विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात होत्या. शाळेच्या चुकीमुळे एका विद्यार्थिनीचे गुण दुसऱ्या त्याच नावाच्या विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत नोंद करण्यात आले होते. यामुळे 2021 मध्ये झालेल्या मंडळ परीक्षेत या विद्यार्थिनीच्या नावावर शून्य गुणांची नोंद झाली होती. जे गुण शाळेतून दिले जातात त्या गुणांच्या संदर्भात ही चूक झाली होती. त्यामुळे विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे ही विद्यार्थिनी 12 वीची परीक्षा देऊ शकली नव्हती. आता या विद्यार्थिनीला नवी सुधारित गुणपत्रिका देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सीबीएसई मंडळाला दिला आहे. तसेच विद्यार्थिनीची हानी केल्याच्या संबंधात संबंधित शाळेवर ताशेरे झाडले आहेत.