आसाममध्ये मिळाला दुसरे महायुद्धकालीन बॉम्ब
सैन्याने सुरक्षित स्वरुपात केला निष्क्रीय
वृत्तसंस्था/ तिनसुकिया
आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील लेडो-लेखपानी भागात दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील एक बॉम्ब नागरी भागात मिळाल्याने खळबळ उडाली. ज्यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित तो बॉम्ब तेथून सुरक्षितस्थळी हलविला. जवळपास 15 इंच लांब आणि 6 इंच व्यास असलेला हा बॉम्ब घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात मिळाला होता. यानंतर भारतीय सैन्याने त्वरित विशेष पथक पाठवत बॉम्बला निष्क्रीय केले आहे.
भारतीय सैन्याच्या रेड शील्ड सॅपर्सनी घटनास्थळी विशेष बॉम्बविरोधी पथक तैनात केले. सैनिकांनी वेगाने आसपासच्या भागाला सील करत तेथून लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. तसेच कठोर सुरक्षा उपाययोजना राबवत दुर्घटना टाळण्याची खबरदारी घेतली होती.
काळजीपूर्वक तपासणी केल्यावर बॉम्बला सुरक्षित स्वरुपात नागरी वस्तीपासून दूर एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले, यानंतर तज्ञांनी एका नियंत्रित अभियानाद्वारे बॉम्ब यशस्वीपणे नष्ट केला आहे. हे अभियान अत्यंत सुनियोजित आणि प्रोफेशनल पद्धतीने पार पाडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.