बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामास गती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. मागील चार वर्षांपासून हे काम थांबले होते. परंतु सध्या दोन टप्प्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण 1200 एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्याचा बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग लोंढामार्गे आहे. लोंढा परिसर हा घनदाट जंगलातून असल्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येतात. त्याचबरोबर वळसा घालून जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ व अंतर वाढत आहे. त्यामुळे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला. धारवाड रेल्वेस्थानकापासून बेळगावच्या देसूर रेल्वेस्थानकापर्यंत नवीन रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे.
या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 600 एकर जागेचे भूसंपादन केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात 600 एकर जागा संपादित केली जाणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने यासाठी टेंडर प्रक्रियेची तयारी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे बेळगाव-धारवाड अंतर कमी होणार असून जलद रेल्वे चालविणे सोयीचे ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.