दलितांचे आरक्षण जाऊ देणार नाही!
कोणत्याही परिस्थितीत दलित, आदीवासी आणि अन्य मागासवर्गीय यांचे आरक्षण जाऊ देणार नाही, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या समाजांचे आरक्षण काढून घेऊन ते विशिष्ट समुदायाला देण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले आहे. मात्र, ते यशस्वी होऊ देणार नाही. या देशातील मतदारही ते मान्य करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी हरियाणातील प्रचार सभेत केले आहे. विरोधक स्वप्ने पहात आहेत. दूधही हाती येण्याआधीच त्यांच्यात तुपासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पाच वर्षांमध्ये पाच नेते करण्याची भाषा केली जात आहे. यामुळे देशाची व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, हे मतदाराला माहीत आहे. त्यामुळे तो भारतीय जनता पक्षाच्या मागे ठामपणे उभा आहे. या लोकसभा निवडणुकीत पुन्हा आमचेच भक्कम सरकार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसऱ्या बाजूला कोण...
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा जनतेचा सेवक आहे. या सेवकाला आपण पारखून घेतले आहे. मात्र, त्याच्या विरुद्ध बाजूला नेमका कोण आहे, याचा पत्ता लागत नाही. अनेक पक्ष एकत्र येण्याचे नाटक करीत आहेत. त्यांचे अनेक नेते आहेत. ते स्वत:च्या स्वार्थासाठी आणि स्वत:च्या कुटुंबाच्या लाभाच्या आशेपोटी एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता कोणावर विश्वास ठेवणार हे निश्चित आहे, असेही प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.