कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये महिलांची सुरक्षा चव्हाट्यावर
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
कोल्हापूर रेल्वे प्रशासन महिलांच्या सुरक्षेसाठी बेफिकीर असल्याचे महिला सफाई कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या प्रकरणातून समोर आले आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर रेल्वे प्रशासनाची राज्यात बदनामी झाली. स्टेशनवर रात्रंदिवस कर्मचारी असताना रेल्वेच्याच व्हीआयपी खोलीत ही घटना घडते हे आश्चर्यकारक आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना केल्या जातात. सुरक्षा म्हणून अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. तरीही महिलावरील अत्याचाराच्या घटनामध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. बदलापूर आणि पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील महिला अत्याचाराचा विसर पडत नाही तोपर्यंत कोल्हापूरात रेल्वे स्टेशनमध्ये महिला अत्याचाराचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले.
कोल्हापूर रेल्वे स्थानकातील स्वच्छतेचा ठेका एका खाजगी कंपनीकडे आहे. ही कंपनी पुण्याची असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. या कंपनीत सुपरवायझर असलेल्या गणेश हंकारे या संशयितांने सफाईचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर 13 एप्रिल रोजी स्थानक प्रमुखांच्या कक्षाला लागून असलेल्या व्हीआयपी खोलीत अत्याचार केला. संबंधित महिला अशिक्षित आणि गरीब कुटुंबातील आहे. यामुळे अत्याचार होऊनही भीतीपोटी ती तीन आठवडे गप्प राहिली. मात्र त्रास होऊ लागल्यामुळे तिने आपल्या कुटुंबासमोर ही घटना सांगितली. यानंतर पिडितेच्या नातेवाईकांनी सोमवारी रेल्वे स्टेशनमध्ये जावून संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामुळे अखेर लोहमार्ग पोलीसांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. संशयित गणेश हंकारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. मात्र रेल्वे स्थानकातील व्हीआयपी खोलीतच ही गंभीर घटना घडल्याने कोल्हापूर रेल्वे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे हे समोर आले आहे.
- वरिष्ठ अधिकारी बेफिकीर
कोल्हापूर रेल्वे स्थानकातून एक्सप्रेस रेल्वेसह कोल्हापूर-मिरज, सातारा, पुणे अशा पॅसेंजर गाड्याही धावतात. यामुळे प्रवाशांची संख्या मोठी आहे. बहुतांश महिला प्रवासी एकट्याने प्रवास करतात. काही वेळा प्रवासी, स्थानकातील प्रतीक्षा कक्षात थांबतात. अशा प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही आहेत. पण काही कार्यालयात सीसीटीव्ही नाहीत. 13 एप्रिल रोजी ज्या व्हीआयपी खोलीत अत्याचाराची घटना घडली, त्याठिकाणी सीसीटीव्ही नाही. तसेच येथील वरिष्ठ अधिकारी स्थानकातील कोणत्याही घटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. यावरुन वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो.
- प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जाईल
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे. सुरक्षेसाठी सर्व स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच रेल्वे पोलीस बल आहे. या बलाकडून 24 तास स्थानकासह रेल्वेमध्ये पाहणी केली जाते. कोल्हापूर रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. मिरज लोहमार्ग पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन योग्य पावले उचलेल.
प्रियांका शर्मा- पुणे,विभागीय सुरक्षा आयुक्त