महिला आरक्षण हा भाजपचा मतदारसंघ ‘सेटिंग’ चा डाव
काँग्रेस प्रभारी अंजली निंबाळकर यांचा दावा
पणजी : येत्या 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणूनच सरकारला आता महिला आरक्षणाचा पुळका आला असून हा सर्वकाही मतदारसंघ ‘सेटिंग’ चा डाव आहे. फेररचनेच्या नावाखाली स्वमर्जीनुसार सीमा आरेखन करायचे आहे, असा दावा काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर यांनी केला आहे. मंगळवारी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष सुनिल कवठणकर व एम. के. शेख यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना निंबाळकर यांनी, महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण सरकारने प्रथम जातीनिहाय जनगणना करावी आणि तिच्या आधारेच महिला आरक्षण लागू करावे.
या आरक्षणाचा उद्देश म्हणजे महिलांनी भारताला दिलेल्या योगदानाचा सन्मान असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या सरकारला लोकसभेतील विद्यमान 543 जागा वाढवून त्या 850 पर्यंत करायच्या आहेत, म्हणूनच हा सर्व खटाटोप आहे. अशावेळी सरकारला जर खरोखरच महिलांचा आदर करायचा असेल तर आधी त्यांनी विद्यमान 543 जागांमध्येच महिलांना सामावून घ्यावे. त्यासाठी सर्व विरोधक पाठिंबा द्यायला तयार असतील, असे त्या म्हणाल्या. अनुसूचित जाती-जमाती आरक्षण जातनिहाय जनगणनेनुसार त्वरित लागू करावे. घरांच्या गणनेत घराच्या पत्त्यासह तुमचे नाव आणि जातीची नोंदणीसुद्धा होते. त्यासाठी काही वेगळे सर्वेक्षण करायची गरज नाही. अशावेळी सरकारने मनावर घेतल्यास तीन - चार महिन्यांत जातनिहाय जनगणनेनुसार सर्व महिलांसाठी न्याय मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असे निंबाळकर यांनी सांगितले.